District Council Panchayat Samiti Rural Power : गावात रस्ता खराब, नळाला पाणी नाही, शाळेत शिक्षक कमी, दवाखान्याचा डॉक्टर गायब, स्थानिक महसूली अधिकारी फरार आणि मग लोक म्हणतात, सरकार काही करत नाही! पण थांब! या सगळ्याची पहिली जबाबदारी कुणाची? उत्तर एकच आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची.. हीच ती ठिकाणं आहेत जिथे खऱ्या अर्थाने गावखेड्याची सत्ता चालते.
पंचायत समिती म्हणजे तालुक्याचा कंट्रोल रूम. ग्रामपंचायतींनी केलेल्या कामावर लक्ष ठेवायचं, सरकारी योजना गावागावात पोहोचवायच्या, निधी वाटायचा, सगळं इथूनच ठरतं. शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा, आरोग्य, महिला-बालकल्याण, रोजगार योजना हे सगळं कागदावर नाही, मैदानात उतरून करायचं काम पंचायत समितीकडे असतं.
हेही वाचा – हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा अन् आम्हाला शिकवा – राज ठाकरे मोहन भागवतांवर टीकास्त्र
जिल्हा परिषद म्हणजे थेट ग्रामीण सत्तेचं मंत्रालय. जिल्हाभरात काय काम होणार, कुठे किती पैसा जाणार, कोणत्या भागाला प्राधान्य — हे सगळं इथे ठरतं. हजारो कोटींचा निधी, शेकडो अधिकारी, हजारो शाळा, दवाखाने अन् बरचं काही इथून चालतं.. म्हणजे जिल्हा परिषदेची सत्ता छोटी नाही भाऊ, भरपूर वजनाची हाय. म्हणूनच जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राजकीय पक्षात धमाल, खेचाखेची आणि घोडेबाजार सगळं काही इथं पाहायला मिळतं. आणि हो, इथले जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती-सदस्य हे उद्याचे आमदार, मंत्री असतात, याला इतिहास साक्षी आहे.
इथे जिंकले, तर पुढे आमदारकीचा रस्ता मोकळा
जिल्हा परिषद–पंचायत समितीची निवडणूक म्हणजे विधानसभा निवडणुक पूर्वीचा सेमीफायनल सामना हाय. इथे जिंकले, तर पुढे आमदारकीचा रस्ता मोकळा. म्हणूनच सगळे दिग्गज, नेते, पक्ष इथे पूर्ण ताकद लावतात. आणि फायनलचा मार्ग मोकळा करतात. ही व्यवस्था म्हणजे फक्त राजकारण्यांसाठी नाही. इथे सामान्य माणसाचा आवाज थेट सत्तेत पोहोचतो. काम चांगलं केलं, तर नेते डोक्यावर. काम नाही केलं, तर जनता थेट घरी बसवते.. एवढी ताकद आहे या संस्थांची.
सरळ सांगा, इथूनच महाराष्ट्राचं राजकारण घडतं!
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणजे गावाचा विकास होणार की नाही, हे ठरवणारी यंत्रणा. म्हणून पुढच्यावेळी कुणी म्हणालं, हे फक्त लोकल राजकारण आहे, तर सरळ सांगा, इथूनच महाराष्ट्राचं राजकारण घडतं! त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामीण प्रशासनाचा कणा आहे असं म्हटलं जातं.
सरते शेवटी पैशांचा घोडेबाजार खुलेआम पाहायला मिळेल
जिल्हा परिषद, पंचायत समित्याचे निकाल लागले मात्र, आता अध्यक्ष, अन् सभापती पदासाठी हालचालींना वेग येईल. प्रत्येकजण महत्त्वाच्या पदासाठी आपली ताकद पणाला लावेल. त्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू होतील. अध्यक्षपद मिळवण्यासाठी धमाल, अंतर्गत रुसवे फुगवे, खेचाखेची, दबावतंत्र आणि सरते शेवटी पैशांचा घोडेबाजार खुलेआम पाहायला मिळेल, अन् ते काय महाराष्ट्राला नवीन थोडा हाय…
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापती पदावर कोण बाजी मारतो
सत्ताधारी पक्षात अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतर्गत वाद वाढण्याची शक्यता आहे. कुणाला संधी द्यायची आणि कुणाला बाजूला ठेवायचे, यावरून पक्षांतर्गत बैठका, नाराजी नाट्य आणि दबावतंत्र सुरू होईल. हे सर्व येत्या दोन दिवसांता पाहायला मिळलं. काही सदस्यांवर दबाव, तर काहींना पदांचे आमिष दाखवली जातील. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापती पदावर कोण बाजी मारतो आणि कोणाला माघार घ्यावी लागते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.











