railway New Improvements : रेल्वे प्रवाशाने (railway passenger) गाडी सुटण्याच्या 8 तासांपेक्षा कमी वेळेत तिकीट रद्द केल्यास त्याला परतावा मिळणार नाही, अशाप्रकारे नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसे नवीन नियम रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी जारी केले आहेत. 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने लागू होणाऱ्या या नवीन नियमांनुसार, परतावा मिळण्याच्या मुदत कालावधीत बदल करण्यात आले आहेत. 8 तासांपेक्षा कमी वेळेत तिकीट रद्द केल्यास त्याला परतावा मिळणार नसल्याने रेल्वे प्रवाशांच्या खिशाला चाट बसणार आहे.
हे ही वाचा: अमेरिकेचे नवीन व्हिसा धोरण काय आहे? का बसतोय भारतीयांना फटका
तिकिटांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार
तिकीट प्रणालीचा (Ticketing System) गैरवापर रोखण्यासाठी अशा प्रकारे निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. तिकिटांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतो. एवढेच नाही तर तात्काळ प्रणालीचाही गैरवापर होतो. यावर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेने बॉटस् आणि फसवे सॉफ्टवेअर ओळखण्यासाठी तंत्रज्ञान आणले. याव्यतिरिक्त, तांत्रिक हस्तक्षेपांमुळे तत्काळ विंडो उघडल्यानंतर लगेचच एजंट आणि दलालांना तिकीट बुक करण्याची क्षमता कमी झाली. तसेच, आधारआधारित ओटीपी पडताळणीची सुरुवात करण्यात आली.
आता देशातील कुठल्याही स्थानकावर काऊंटर तिकीट रद्द
पूर्वी केवळ मूळ स्थानकांवरच तिकीट रद्द करण्याची अट होती. परंतु ही अट आता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशातील कुठल्याही स्थानकावर काऊंटर तिकीट रद्द करता येईल. ई-तिकिटांसाठी तिकीट ठेव पावती (टीडीआर) दाखल करण्याची अट काढून टाकली आहे. तिकीट रद्द केल्यावर परतावा आपोआप दिला जाईल.
बोर्डिंग स्टेशन बदलणे शक्य
प्रवाशांसाठीच्या आणखी एका उपाययोजनेनुसार, प्रवासी आता रेल्वे सुटण्याच्या 30 मिनिटे आधीपर्यंत आपला प्रवास वर्ग (ट्रॅव्हल क्लास) अपग्रेड करू शकतात. पूर्वी हे बदल केवळ चार्ट तयार होण्यापूर्वीच करता येत होते. प्रवाशांना गाडीच्या मूळ स्थानकावरून सुटण्यापूर्वी 30 मिनिटांपर्यंत, डिजिटल माध्यमातून आपले गाडीत चढण्याचे स्थान (बोर्डिंग स्टेशन) बदलणे शक्य झाले आहे.
नवीन नियम आणि सध्याचा कालावधी
गाडी सुटण्याच्या 72 तासांहून अधिक काळ तिकीट रद्द केल्यास पूर्ण रकमेचा परतावा (सध्याचा कालावधी : 48 तासांहून अधिक)
गाडी सुटण्याच्या 24 ते 72 तासांदरम्यान तिकीट रद्द केल्यास 25 टक्के रक्कम कापणार (सध्याचा कालावधी: 12 ते 48 तास)
गाडी सुटण्याच्या 8 ते 24 तासांदरम्यान रद्द केल्यास भाड्यापैकी 50 टक्के रक्कम कापली जाईल. (सध्याचा कालावधी: 12 ते 4 तास म्हणजेच चार्ट तयार होईपर्यंत)





