Ravikant Tupkar Farmers Loan Waiver : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुकारलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपले असून, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जीव गेला तरी चालेल, पण आता मागे हटणार नाही,” या त्यांच्या गर्जनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानासमोर १५ जून २०२६ पासून सुरू झालेले हे आंदोलन केवळ एका नेत्याचे वैयक्तिक उपोषण राहिलेले नसून, तो संपूर्ण राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांचा हुंकार ठरत आहे. राज्य सरकारने नुकतीच जी कर्जमाफी जाहीर केली, ती म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे तुपकरांचे स्पष्ट मत आहे. ही योजना केवळ बँकांचे थकीत कर्ज वसूल करण्यासाठी आखलेली एक चाल असून, सामान्य शेतकऱ्याला याचा कोणताही ठोस फायदा होणार नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यामुळेच, केवळ कागदी आश्वासनांवर समाधान न मानता, आता आरपारची लढाई लढण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे पुढील काळात या आंदोलनाला कोणतं वळण मिळतंय हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अनेक आंदोलनं झाल्यानंतर सरकारनं नाय नाय म्हणत कर्जमाफी जाहीर केली, मात्र राज्य सरकारने आणलेली ‘वन-टाइम सेटलमेंट’ योजना ही तांत्रिक गुंतागुंतीने भरलेली आहे. यामध्ये शेतकऱ्याला स्वतःचा हिस्सा भरण्यास सांगितले जात आहे, जो भरणे सध्याच्या दुष्काळी आणि आर्थिक संकटाच्या स्थितीत शेतकऱ्याला अशक्य आहे. तुपकरांची मुख्य मागणी ही आहे की, सरकारने कोणत्याही अटी शर्थीशिवाय शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करावा. शेतकऱ्यांनी कर्ज काढले ते हौसेपोटी नाही, तर निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सरकारच्या चुकीच्या शेतीधोरणांमुळे ते कर्जबाजारी झाले आहेत, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमुक्तीचा लेखी आदेश निघत नाही आणि त्याची अंमलबजावणी सुरू होत नाही, तोपर्यंत अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाही, यावर ते ठाम आहेत.
तांत्रिक कारणांचा आधार घेऊन शेतकरी वाऱ्यावर
कर्जमाफीसोबतच पीकविम्याचा प्रश्नही तितकाच पेटलेला आहे. विमा कंपन्या दरवर्षी शेतकऱ्यांच्या खिशातून कोट्यवधी रुपये प्रीमियमच्या स्वरूपात गोळा करतात, मात्र जेव्हा नुकसान भरपाई देण्याची वेळ येते, तेव्हा तांत्रिक कारणांचा आधार घेऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते. २०२४-२५ या वर्षातील पीकविम्याची रक्कम अद्याप अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. याउलट, काही भागात तर विमा कंपन्यांचे प्रतिनिधी पंचनामे करण्यासाठीही फिरकले नाहीत. या अन्यायाविरुद्ध तुपकरांनी आवाज उठवला असून, हक्काचा विमा आणि अतिवृष्टीची मदत तात्काळ मिळायला हवी, अशी त्यांची मागणी आहे. या मागण्यांसाठी त्यांनी यापूर्वीही अनेक आंदोलने केली, परंतु प्रत्येक वेळी केवळ आश्वासन देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. म्हणूनच यावेळी त्यांनी अन्नत्याग हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातून शेतकरी बुलढाण्याकडे
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातून शेतकऱ्यांचे बुलढाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. तुपकरांच्या प्रकृतीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये मोठी चिंता आहे, तरीही तुपकर स्वतः मात्र कमालीचे शांत आणि निश्चयी दिसत आहेत. त्यांनी डॉक्टरांना तपासणी करण्यास मज्जाव केला असून, जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारला थांबवता येत नसतील, तर माझ्या बलिदानाने जर त्यांना जाग येणार असेल, तर मी त्यासाठी तयार आहे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे. या आंदोलनाला आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. ऑल इंडिया पँथर सेनेने या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला असून, राज्यातील इतर अनेक शेतकरी संघटनांनीही या आंदोलनाशी आपली नाळ जोडली आहे.











