Mumbai Open Manhole Accident: मुंबईतील साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आणखी एक धक्कादायक दुर्घटना समोर आली आहे. साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबईतील नागरी सुविधांवर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मृत व्यक्तीचे नाव अस्लम शेख असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ते मोबाईलवर बोलत रस्त्याने जात असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडले. त्या भागात देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मॅनहोलचे झाकण उघडे होते. पावसाचे पाणी साचल्यामुळे मॅनहोल दिसून न आल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा: ‘महायुतीचा प्रस्ताव आल्यास विचार करु’ शरद पवारही सत्तेत जाणार? कोल्हेंनी दिले संकेत
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि संबंधित यंत्रणांनी शोधमोहीम सुरू केली. शोधादरम्यान घटनास्थळी मृत व्यक्तीची चप्पल आणि छत्री आढळून आली. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने संबंधित व्यक्ती वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
या घटनेवर आमदार दिलीप लांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसऱ्याच पावसात मॅनहोलमध्ये व्यक्ती पडण्याची ही तिसरी घटना असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनावर निशाणा साधला. “नेमकं ही घटना अपघात आहे की घातपात, याची चौकशी केली जाईल. मात्र, केवळ चौकशीची घोषणा करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही,” असे ते म्हणाले.
लांडे यांनी पुढे, “मुंबईकरांचे जीव प्रशासनासाठी इतके स्वस्त झाले आहेत का? कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळत नसतील, तर या खर्चाचा उपयोग काय?” असा सवाल उपस्थित केला. तसेच, मॅनहोलचे झाकण कोणी उघडे ठेवले, संबंधित कंत्राटदार किंवा अधिकारी कोण, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता उघड्या मॅनहोलमुळे आणखी एका नागरिकाचा जीव गेल्याने मुंबईतील पावसाळी सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनीही प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त करत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.










