Bihar News: बिहारमध्ये TRE – शिक्षक भरती परीक्षेच्या नियमांवरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. निगेटिव्ह मार्किंग, परीक्षेचा नवा पॅटर्न आणि डोमिसाइलसह विविध मागण्यांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी पटना येथे आंदोलन करत मुख्यमंत्री निवासाच्या दिशेने मोर्चा काढला.
बिहारची राजधानी पटना सध्या विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चेत आहे. BPSCच्या TRE – ४ शिक्षक भरती परीक्षेच्या नियमांवरून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री निवासाच्या दिशेने मोर्चा काढला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स हटवल्याने पोलिसांसोबत तणाव निर्माण झाला.
या आंदोलनामागे केवळ परीक्षा कधी होणार, हा मुद्दा नाही. परीक्षा पद्धती, निगेटिव्ह मार्किंग, डोमिसाइल आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता अशा अनेक मागण्यांवर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा: लाडक्या बहिणीसाठी गिफ्ट निवडताना कन्फ्युज आहात? मग सोन्याचे हे 3 पर्याय नक्की पाहा!
32 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती
BPSC ने TRE- ४ अंतर्गत ३२,३८८ शिक्षक पदांची जाहिरात जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू होऊन ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. मात्र परीक्षेची अंतिम तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
भरतीची घोषणा झाल्यानंतरही विद्यार्थ्यांचं आंदोलन थांबलेलं नाही. कारण त्यांच्या मते, भरतीतील मूलभूत नियमांबाबतचे प्रश्न अजूनही कायम आहेत.
विद्यार्थ्यांचा एकल परीक्षेवर आग्रह
आंदोलकांची प्रमुख मागणी म्हणजे TRE – ४ साठी एकाच टप्प्यात परीक्षा घेण्यात यावी. BPSC ने मात्र परीक्षा दोन टप्प्यांत Prelims आणि Mains घेण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. निगेटिव्ह मार्किंगही कायम ठेवण्यात येणार असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
विद्यार्थ्यांचा आक्षेप याच दोन मुद्द्यांवर सर्वाधिक आहे. त्यांच्या मते, परीक्षा प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाल्यास उमेदवारांवरील मानसिक आणि आर्थिक ताण वाढेल.
डोमिसाइलचा मुद्दाही ऐरणीवर
शिक्षक भरतीमध्ये बिहारमधील उमेदवारांना अधिक संधी मिळावी, अशी मागणीही आंदोलनात करण्यात येत आहे. डोमिसाइल पॉलिसीबाबत स्पष्टता आणि स्थानिक उमेदवारांच्या हक्कांचं संरक्षण हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील महत्त्वाचा मुद्दा आहे.
याशिवाय भरती प्रक्रियेत पारदर्शकता, कथित गैरप्रकारांवर कारवाई आणि विविध सरकारी भरतींमधील नियमांबाबतही विद्यार्थी संघटनांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आंदोलनाचा तणाव वाढला
पटना येथील गर्दनीबाग परिसरात विद्यार्थी काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. TRE-4ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतरही मागण्या मान्य न झाल्याने आंदोलन सुरूच राहिलं.
मंगळवारी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री निवासाच्या दिशेने मोर्चा काढला. जेपी गोलंबर परिसरात पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स विद्यार्थ्यांनी तोडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला.
हेही वाचा: 10 उपोषणं झाली, आरक्षण नाही! जरांगेंच्या 11व्या लढाईआधी जाणून घ्या पूर्ण हिशोब
सरकारसमोर मोठं आव्हान
एकीकडे ३२, ३८८ शिक्षक पदांची भरती जाहीर करून सरकारने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, तर दुसरीकडे भरतीच्या नियमांवरून विद्यार्थ्यांचा असंतोष वाढत आहे.
BPSCने दोन टप्प्यांची परीक्षा आणि निगेटिव्ह मार्किंग कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आयोगाची भूमिका यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
आता सरकार विद्यार्थ्यांशी चर्चा करून तोडगा काढणार की आंदोलन आणखी तीव्र होणार, याकडे बिहारचं लक्ष लागलं आहे. TRE-4चा मुद्दा आता केवळ एका शिक्षक भरती परीक्षेपुरता मर्यादित राहिलेला नसून, बिहारमधील तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नाचं मोठं राजकीय केंद्र बनताना दिसत आहे.



