Bargi Dam Cruise Accident : मध्य प्रदेशातील जबलपूर इथं बर्गी धरणात झालेल्या क्रूझ शिप अपघातामुळं मोठा निष्काळजीपणा उघड झाला आहे. अपघाताच्या केवळ एक दिवस आधी हवामान विभागानं ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह जोरदार वादळाचा इशारा दिला होता. असं असूनही, गुरुवारी दुपारी 4:30 च्या सुमारास क्रूझ शिप बर्गी धरणात सोडण्यात आली. दरम्यान, जोरदार वाऱ्यामुळे क्रूझ शिप उलटली.
हेही वाचा : ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; मुंबई-पुण्यादरम्यान
अहघातात 9 ठार :
प्राथमिक माहितीनुसार, जबलपूर क्रूझ शिप अपघातातील मृतांची संख्या 9 झाली असून, अंदाजे 15 जणांना सुखरुप वाचवण्यात आलं आहे. आणखी नऊ जण अद्याप बेपत्ता असून, बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझ शिप धरणाच्या पृष्ठभागाखाली सुमारे 20 मीटर अडकली असून, त्यामुळं बचावकार्यात अडचणी येत आहेत.
धरणाच्या काठापासून 300 मीटर अंतरावर अपघात :
हा अपघात बर्गी धरणाच्या काठापासून अंदाजे 300 मीटर अंतरावर झाला. स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ आणि डायव्हिंग टीम घटनास्थळी असून बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहेत. सकाळ होताच जबलपूरमधील मदत आणि बचाव कार्य अधिक वेगानं झालं. घटनास्थळावरून आलेल्या छायाचित्रांमध्ये बचाव पथकं पाण्यात सतत शोध घेत असल्याचे दिसत होते.
प्रशासकीय निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह :
या अपघातामुळं सुरक्षा मानकं आणि प्रशासकीय निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हवामान खात्यानं इशारा देऊनही क्रूझ जहाजाला कसं चालवण्याची परवानगी देण्यात आली, हे निश्चित करण्यासाठी चौकशीचे आदेश दिले जाऊ शकतात. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, गुरुवारी वादळामुळे बर्गी धरणावर 29 प्रवाशांना घेऊन जाणारी एक क्रूझ बोट उलटली होती. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या अपघातात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि 15 जणांना वाचवण्यात आले. उर्वरित वाचलेल्यांचा शोध सुरू आहे.
पंतप्रधान मोदींकडून सानुग्रह मदतीची घोषणा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर लिहिलं की, मध्य प्रदेशातील जबलपूर इथं बोट उलटल्यानं झालेली जीवित आणि मालमत्तेची हानी अत्यंत वेदनादायी आहे. या दुःखद घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्या सर्वांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. मी जखमींच्या शीघ्र आरोग्यासाठी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहे. पंतप्रधान राष्ट्रीय बचाव दलातर्फे (PMNRF) मृतकांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.






