नवी दिल्ली Kailash Manasarovar Yatra 2026 : कैलाश मानसरोवर यात्रेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कैलाश मानसरोवर यात्रा यावर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. या यात्रेसाठी याकाळात दोन मार्ग उपलब्ध असतील. पहिला मार्ग उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीमार्गे कैलाश मानसरोवरला पोहोचेल, तर दुसरा मार्ग सिक्कीममधील नाथू ला मार्गे कैलाश मानसरोवरला पोहोचेल. या यात्रेसाठी ऑनलाइन अर्ज करता येतील. तसंच यात्रेसंबंधित सर्व माहिती वेबसाइटवर उपलब्ध असेल. कैलाश मानसरोवर यात्रेसाठी 19 मे पर्यंत अर्ज सादर करता येणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.
हेही वाचा : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबईत 4 तासांसाठी बंद राहणार रेल्वे
100 भाविक दोन मार्गांनी प्रवास करणार :
चीन सरकारच्या समन्वयानं परराष्ट्र मंत्रालयानं आयोजित केलेली कैलाश मानसरोवर यात्रा जून ते ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली. त्यात पुढं म्हटलंय की, “यावर्षी 50 यात्रेकरूंच्या 10 तुकड्या उत्तराखंडमार्गे लिपुलेख खिंड ओलांडतील आणि 50 यात्रेकरुंच्या इतर 10 तुकड्या सिक्कीममार्गे नाथू ला खिंड ओलांडतील.” या नोंदणीची अंतिम तारीख 19 मे आहे.
वेबसाइटद्वारे करता येणार अर्ज :
कैलाश मानसरोवर यात्रेसंदर्भात परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे, “kmy.gov.in या वेबसाइटवर अर्ज स्वीकारले जात आहेत. यात्रेकरूंची निवड निष्पक्ष, संगणक-निर्मित, यादृच्छिक आणि लिंग-संतुलित निवड प्रक्रियेद्वारे केली जाईल. इच्छुक अर्जदार वेबसाइटवर नोंदणी करुन लॉग इन करू शकतात आणि त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करू शकतात. माहिती मिळवण्यासाठी अर्जदारांना पत्र किंवा फॅक्स पाठवण्याची आवश्यकता नाही. माहिती मिळवण्यासाठी, निरीक्षणं नोंदवण्यासाठी किंवा यात्रेत सुधारणा करण्यासाठी सूचना देण्यासाठी वेबसाइटवर दिलेल्या अभिप्राय पर्यायांचा वापर केला जाऊ शकतो.”
कैलाश मानसरोवर यात्रेचं महत्त्व काय :
चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात स्थित कैलास पर्वत आणि मानसरोवर तलावाची यात्रा हिंदू, तसंच जैन आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. भारत आणि चीन यांच्यातील संबंध सामान्य करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, सुमारे पाच वर्षांच्या खंडानंतर ही यात्रा गेल्या वर्षी पुन्हा सुरु झाली. ही यात्रा प्रथम 2020 मध्ये कोविड महामारीमुळं आणि नंतर पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) दोन्ही बाजूंमधील लष्करी तणावामुळं पुढं ढकलण्यात आली होती.






