Bageshwar Baba: बागेश्वर धमाचे पिठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात RSS कौतुकात नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.
नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी हिंदू कुटुंबांना अधिक मुले होण्याचे आवाहन करत “किमान चार मुले असावीत” असे मत व्यक्त केले. तसेच या मुलांचे संगोपन धर्म आणि राष्ट्रसेवेच्या दिशेने केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा: मोठा राजकीय भूकंप! राघव चढ्ढा आपमधून बाहेर पडताच अण्णा हजारे म्हणाले…
या कार्यक्रमात त्यांनी पुढे असेही सुचवले की चार मुलांपैकी एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले जावे. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
नागपूरमधील या कार्यक्रमाला संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. याच व्यासपीठावर धीरेंद्र शास्त्री यांनी आरएसएसचे कौतुक करताना सांगितले की, आपत्तीच्या काळात संघाचे स्वयंसेवक मदतीसाठी पुढे येतात आणि लोकांचे प्राण वाचवतात, इतर अनेकजण मात्र सुरक्षिततेकडे धाव घेतात.
त्यांनी पुढे असा विश्वास व्यक्त केला की भविष्यात भारत “अखंड भारत” या संकल्पनेच्या दिशेने पुढे जाईल आणि त्या काळात मोठे बदल पाहायला मिळतील. तसेच संघाच्या नेतृत्वाखाली काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील, असेही त्यांनी सूचित केले.
“भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट कठीण” – धीरेंद्र शास्त्री
यापूर्वी प्रयागराजमधील एका कथेमध्ये त्यांनी सनातन धर्मावरील आव्हानांबाबत भाष्य करत सर्व सनातनी लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. तसेच भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट कठीण असून त्यासाठी त्याग आणि संघर्ष आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
त्यांनी निवडणुकीच्या संदर्भातही मत व्यक्त करत काही पक्ष आणि उमेदवारांवर टीका केली होती आणि “वंदे मातरम्” गाण्याच्या विरोधावरून लोकांनी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन केले होते.




