High Alert Storm Warning : राज्यासह देशातील शेतकरी राजा सध्या मॉन्सूनची आतुरतेने वाट पाहात आभाळाकडे तोंड करून उभा आहे. असं असताना आता मात्र चिंता व्यक्त करणारी अपडेट भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आली आहेत. तसेच अनेक राज्यांना अलर्ट देखील जारी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढली आहे. देशातील काही भागात मॉन्सून दाखल झाला असला तरी अनेक भागात पाऊस न झाल्याने तिथेच ६० ते १०० ताशी वेगाने जोरदार वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी जेवढी आनंदाची आहे तेवढीच चिंता वाढवणारी आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे वेगाने पुढे सरकत असताना भारताच्या वायव्यवर वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला. ज्याने ज्या राज्यात मॉन्सून अजून दाखल झाला नाही तिथेच वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. उत्तर भारतात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 11 ते 13 जून दरम्यान कमाल तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसची घट नोंदवली जाऊ शकते. दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसासह वादळ, धुळीची वादळाची शक्यता आहे.
पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मॉन्सून दाखल
आज राज्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याला उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला. मॉन्सूनची परिस्थिती आहे तशीच आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मॉन्सून दाखल झाला. मात्र, अरबी समुद्रावरून मॉन्सून पुढे सरकत नाहीये. आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता आहे.
उकाड्याने त्रस्त झालेल्या नागपूरकराना काहीसा दिलासा
नागपुरात काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. सकाळपासून उन्हाच्या ताडाख्यानंतर दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले. सायंकाळ होताच हलक्या पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह काही भागात पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाने पावसाचा अंदाज विदर्भात वर्तवला होता. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागपूरकराना काहीसा दिलासा मिळाला. जून महिन्याचा पहिला आठवडा पूर्णपणे उलटून गेला आणि मृग नक्षत्र सुरू होऊन दोन दिवस झाले तरी देखील मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली नाही.
जालन्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या चिंतेत आणखी भर पडली. सद्यस्थितीला जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मशागती उरकून खरीप हंगामाच्या लागवडीकरिता आपल्या शेतजमिनी सज्ज करून ठेवल्या. मात्र पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे सध्या लागवडी ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे खरीप हंगामातील उत्पादनावर देखील याचा मोठा परिणाम होणार असल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.












