Horrific Road Accident : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात बुधवारी रात्री एक भीषण अपघात घडला. चिखलिया येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मजुरांनी भरलेलं एक पिकअप वाहन अनियंत्रित होऊन उलटला, यात 16 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ आणि आरडाओरडा सुरु झाला. ही घटना बुधवारी रात्री घडल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार; शिंदेंच्या उपस्थितीत बच्चू कडूं म्हणाले….
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, पिकअप ट्रकमध्ये अंदाजे 30 ते 35 मजूर त्यांच्या मुलांसह अमझेराकडे जात होते. हा अपघात बुधवारी रात्री 9 च्या सुमारास घडला. अमझेराकडे जाणाऱ्या पिकअप ट्रकवरील चालकाचं नियंत्रण अचानक सुटलं आणि तो उलटला, ज्यामुळं सर्व मजूर आत अडकले. तसंच भरधाव वेगानं जाणारा पिकअप ट्रक रस्त्याच्या दुभाजकाला धडकला.
अपघातामुळं एकच गोंधळ
या भीषण अपघातामुळं घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. रस्त्यावरुन जाणारे लोक आणि स्थानिक रहिवासी तात्काळ घटनास्थळी धावून गेले आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढून बचावकार्य सुरु केलं. अनेक जखमी कामगार रस्त्यावर पडले होते, त्यामुळं परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. सर्व जखमींना रुग्णवाहिकेनं धार जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं.
पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून, मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये, तर गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि इतर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. याव्यतिरिक्त, इंदूरचे विभागीय आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक यांना धार इथं जाऊन उपचाराच्या सुविधा सुनिश्चित करण्यास सांगितलं आहे. सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील.






