Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. सकाळी दहा वाजता ते रखरखत्या उन्हात उपोषणावर बसणार असून त्यांच्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. मात्र या चर्चेनंतरही जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत.
दरम्यान, सरकारकडून त्यांच्या काही मागण्यांवर लेखी स्वरूपात तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज संबंधित मसुदा (ड्राफ्ट) मिळण्याची शक्यता आहे. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज पुन्हा एकदा त्यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: 15 राज्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनच्या आगमनापूर्वीच हवामानात मोठा बदल, IMD चा मोठा इशारा
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, ” जरांगे पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. काही मुद्द्यांवर सरकारी पातळीवर कार्यवाही सुरू आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत. मात्र विद्यार्थाचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”
ते पुढे म्हणाले की, “त्यांनी मांडलेल्या मागण्यांचा अभ्यास सुरू असून समाधानकारक तोडगा निघेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आवश्यकता भासल्यास मी स्वतः त्यांची पुन्हा भेट घेईन.”
जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाइन नंबर उपलब्ध
दरम्यान, सरकारकडून जिल्हास्तरावर हेल्पलाइन सुरू करण्याची तयारीही सुरू आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून देण्यात येणार असून नागरिकांच्या तक्रारींचा साप्ताहिक आढावा घेतला जाणार आहे.
दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी 58 लाख नोंदी सापडल्याचा दावा करत त्या यादीची अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. “ज्यांना प्रमाणपत्राची गरज आहे ते घेतील, ज्यांना नको आहे ते घेणार नाहीत,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेला हा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला असून आजच्या उपोषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.












