Manoj Jarange protest warning : मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्रात असून त्यापूर्वी त्यांनी त्यांनी सरकारला कडक इशारा दिला आहे. मागील अनेक आंदोलने करून त्यांना पाहिजे ते यश न मिळाल्याने आता मात्र आरपारच्या लढाईची घोषणा जरांगेंनी केलीय. यावेळच उपोषण हे भर उन्हात असणार आहे. कोणताही मंडप नाही, की सावली नाही. एवढेच काय ते पाणी देखील पिणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. जरांगे यांचे 30 मे पासून उपोषण सुरू होईल. भर उन्हात आंदोलन करत असताना मी उष्माघाताने मेलो तर त्याला सरकारच जबाबदार असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटीत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आंदोलन दिशा ठरवली आहे. प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर आणि आश्वासनानंतरही सरकार दरबारी आरक्षणासाठीच्या काहीच हालचाली दिसून आल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे तिव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा मार्ग आवलंबला आहे. त्यांच्या बोलण्यातून उद्वेग आणि संताप दिसत होता. त्यातूनच त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
देशात झालं नसेल असं उपोषण होणार
“मी येत्या 30 तारखेला उपोषणा बसणार आहे. आमरण उपोषण असणार आहे. देशात झालं नसेल असं उपोषण होणार आहे. मागच्यावेळी उपोषण करताना मंडप टाकला होता. यावेळी मंडप टाकला जाणार नाही. मी सावलीत बसून उपोषण करणार नाही. असाच जाऊन बसणार आहे. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात मी बसणार आहे. मेलो तर मेलो. कुणीही समाजबांधवांनी अंतरवलीकडे येऊ नका,” असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
तुम्हाला फक्त मराठ्यांचीच मते हवी आहेत का? – जरांगे
सरकारला उद्देशून जरांगे म्हणाले, “या सरकारला अनेकदा वेळ दिला. कितीदा मुदत दिली. सरकार काही करत नाही. 16 तारखेपासून वेळ दिला. काहीच झालं नाही. 29 ऑगस्ट 2026 ला मुंबईत आलो होतो. तेव्हापासून वेळ दिला. त्यानंतरही काहीच झालं नाही. आता सरकारचे मंत्री अंतरवलीत येऊन काय करणार आहे?, असा सवाल त्यांनी केला. मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो? पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी सदन नाही. तुम्हाला फक्त मराठ्यांचीच मते हवी आहेत का? बाकी गरीबांच्या समस्यांशी काही देणंघेणं नाही का?” असा सवाल त्यांनी केला आहे.
आपण देणारे आणि मिळवणारे आहोत, हे विरोधक विसरले
यावेळी आंदोलनकांना उद्देशून जरांगे म्हणाले, “मी तुमच्या लेकरांसाठी लढत आहे. लढत राहणार आहे. तुम्ही माझे आहात. पण तुम्ही अंतरवली सराटीत येऊ नका. तुमचा उद्रेक होऊ देऊ नका. तुम्ही शांत राहा. आपल्याला आपलं हक्काचं आरक्षण शांततेने घ्यायचं आहे. आपण लढून कष्ट करणारी औलाद आहोत. आपण लढून साम्राज्य उभी करणारी औलाद आहोत. त्यामुळे निर्धास्त राहा. आपण देणारे आहोत. आज आपल्यावर वेळ आली आहे, तर सर्वच विरोध करत आहेत. आपण देणारे आणि मिळवणारे आहोत, हे विरोधक विसरले आहेत” असं त्यांनी सांगितलं.












