Uddhav Thackeray: नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या रामरक्षा आंदोलनात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मंदिरांमधील कथित गैरव्यवहार, सोनम वांगचुक प्रकरण आणि राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
Ramraksha Andolan : रामरक्षा पठण कार्यक्रमाला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ” आज राममंदिराच्या रक्षणासाठीच लढा उभारण्याची वेळ आली आहे. रामरक्षा म्हणणं हे देवेंद्र फडणवीसांचं काम असेल, पण रामाचं रक्षण करणं हे आमचं काम आहे.”
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवल्याच्या घटनेवरही त्यांनी संताप व्यक्त केला. ” वांगचुक यांनी जणू काही एखाद्या अतिरेक्याला पकडावं, अशा पद्धतीने ताब्यात घेण्यात आलं. शांततेने आंदोलन करणाऱ्या व्यक्तीशी अशी वागणूक लोकशाहीला शोभणारी नाही,” अशी टीका त्यांनी केली.
ठाकरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभिजीत दिपके यांचाही उल्लेख करत, “अभिजीत दिपके यांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. आंदोलन दडपण्यासाठी अशा पद्धतीचा वापर केला जात असेल, तर हा लोकशाहीवरील आघात आहे,” असा आरोप केला.
भाजपावर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले, “भाजपातला सैतान आता जागा झाला आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. एवढी सत्तेची लालसा लोकशाहीसाठी धोकादायक आहे.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचाही उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “भागवतांना मंदिरांमधील तिजोऱ्या फोडणारं हिंदू राष्ट्र अपेक्षित होतं का? मंदिरांची संपत्ती आणि श्रद्धा यांचं रक्षण करण्याऐवजी त्यावरच डल्ला मारला जात असेल, तर हा गंभीर विषय आहे.”
Ramraksha Andolan :
रामरक्षा आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रामरक्षा पठण केले. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली आणि मंदिरांच्या संरक्षणासह विविध मुद्द्यांवर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, त्यांच्या आरोपांना सत्ताधारी पक्षाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









