Padmalaya Jungle Massacre : नाशिक येथे पाणीपुरीच्या ठेल्यावर ओळख झालेल्या प्रेमसंबंधाचा शेवट जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पद्मालयच्या जंगलात निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वप्नील उर्फ गोलू पाटील (वय २१, रा. पहुर) याला अटक केली असून त्याने हत्येची कबुली दिली आहे.
हेही वाचा – मालेगाव महापौर निवडणुकीत सेक्युलर फ्रंटच्या नसरीन बानो शेख यांचा ऐतिहासिक विजय
मृत तरुणीचे नाव आकांक्षा उर्फ अजय हेमराज गद्रे (मूळ रा. छत्तीसगड, सध्या सुरत) असे असून, ती तृतीयपंथी असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक येथे दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, आकांक्षा तृतीयपंथी असल्याचे समजल्यानंतर स्वप्नीलने संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर आकांक्षाने लग्नाचा तगादा लावल्याने दोघांत तणाव वाढला.
३१ जानेवारी २०२६ रोजी आकांक्षा सुरतवरून जळगावला आली. दोघे पद्मालय मंदिर परिसरात गेले असता जंगलात वाद झाला. यावेळी स्वप्नीलने आकांक्षाच्याच ओढणीने गळा दाबून तिची हत्या केली आणि मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
४ फेब्रुवारी रोजी जंगलात अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. पायावरील मॅजेंटा नेल पॉलिश व नाकातील सोन्याची मुरनी या आधारावर पोलिसांनी तपासाची दिशा ठरवत आरोपीपर्यंत मजल मारली. सखोल चौकशीत स्वप्नीलने गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.












