Pune Tribal Students Protest: पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण १६ व्या दिवशीही सुरूच आहे. मंत्री अशोक उईके यांच्यासोबत पाच तास चर्चा होऊनही दोन प्रमुख मागण्यांवर अंतिम निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन कायम ठेवले आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांकडून पुण्यात सुरू असलेले उपोषण आज १६ व्या दिवशीही सुरूच आहे. सरकारला दिलेली दोन दिवसांची मुदत संपल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर ठोस निर्णय झालेला नसल्याने आंदोलन मागे घेण्यात आलेले नाही.
मांजरी परिसरात गेल्या १६ दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी अनेक मागण्यांसाठी (tribal students hunger strike) आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या १५ सदस्यीय शिष्टमंडळासोबत तब्बल पाच तास चर्चा करण्यात आली. मात्र चर्चेनंतरही आंदोलनावर तोडगा निघाला नसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा: मुंबईकरांना मोठा झटका! साखरेनंतर आता दूधाच्या दरात तब्बल 9 रुपयांची वाढ? जाणून घ्या नेमकं कारण
सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांनी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका कायम ठेवली आहे. सरकारकडून काही मागण्यांबाबत चर्चा झाली असली तरी दोन प्रमुख मागण्या अद्याप प्रलंबित असल्याची माहिती आहे.
यामध्ये राज्यातील 12 हजार 500 पदांच्या नोकरभरतीची (government job recruitment Maharashtra) जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच मुलांसाठी आणि मुलींसाठी शहराच्या परिसरात स्वतंत्र वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी दुसरी मागणी आहे. या दोन्ही मागण्यांवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सलग 16 दिवस उपोषण सुरू असल्याने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. उपोषणातील सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते आणि आंदोलनाबाबत पुढील भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.
थोडक्यात
पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण 16व्या दिवशीही सुरू आहे.
सरकारला दिलेली दोन दिवसांची मुदत संपली आहे.
12,500 पदांच्या नोकरभरतीची जाहिरात काढण्याची मागणी अद्याप प्रलंबित आहे.
मुला-मुलींसाठी शहरात स्वतंत्र वसतिगृहांची मागणीही पूर्ण झालेली नाही.
मंत्री अशोक उईके आणि विद्यार्थी शिष्टमंडळामध्ये पाच तास चर्चा झाली.
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची विद्यार्थ्यांची भूमिका आहे.
उपोषण करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे.








