Maharashtra Foreign Investment Gateway : भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे गेटवे ऑफ इंडिया आहे. म्हणूनच भारतातील इतर राज्यांशी आमची चांगल्या अर्थाने स्पर्धा आहे. देशासाठी ही बाब चांगलीच ठरत असून यातही महाराष्ट्र पुढे आहे याचा अभिमान वाटतो. याशिवाय ‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक स्वित्झर्लंड येथील दावोस येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह प्रतिनिधीमंडळ उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पॅव्हेलीयन मध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
📍 #दावोस, स्वित्झर्लंड
भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच ‘गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणुकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी… pic.twitter.com/UalzIGYup0
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 20, 2026
तिसरी मुंबई उभी राहण्याच्या तयारीत
महाराष्ट्रातील सर्व भौगोलिक क्षेत्रासाठी गुंतवणूक मिळवणार आहे. त्यानुसार वैविध्यपूर्ण अशा 10 ते 12 क्षेत्रातील उद्योगांसोबत समन्वय साधला जात आहे. तर आता तिसरी मुंबई उभी राहत असून त्यासाठी मोठी गुंतवणूक मिळण्याचे संकेत निर्माण होत आहे. यासाठी आमच्याकडे उत्तम मेन्यू कार्ड तयार असून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आपण यशस्वी होऊ, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम गुंतवणूकदारांसाठी चावडी
दावोस येथे झालेली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक ही उद्योग, गुंतवणूकदारासाठी एक प्रकारे चावडी असल्याचे आपण म्हणू शकतो. याठिकाणी आम्ही दरवर्षी महाराष्ट्राकडे काय आहे, कोणती क्षमता आहे, यावर फोकस करण्यासाठी येत असतो. त्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करता येईल असा विश्वास आहे. कारण देशात करता येणारी गुंतवणूक आणि त्याबाबतचे करार करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यानुसार सुमारे 60 ते 65 करार प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्राला यश मिळाले.
हे ही वाचा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 2 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात; दोघांना पाठवण्यात आली नोटीस
उद्योजकांनी या मंचाचा पुरेपूर उपयोग करावा
दावोस परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहेच. इथे उद्योगजगत एकत्र येतो. महाराष्ट्रातून आलेल्या उद्योजकांनी या मंचाचा पुरेपूर उपयोग करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती आव्हानात्मक असली, तरी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अंदाजानुसार भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेतील ‘ब्राइट स्पॉट’ आहे. जगभरातील विकासदर मंदावले असतानाच महाराष्ट्र मात्र आपला विकासदर टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे.
महाराष्ट्रात देशातील 39 टक्के थेट परकीय गुंतवणूक
आज महाराष्ट्रात गुंतवणुकीची कमतरता नाही; गरज आहे ती योग्य वातावरण निर्माण करण्याची, ते वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. मागील वर्षी भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 39 टक्के ‘एफडीआय’ महाराष्ट्रात आला आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्य शासनाने आतापर्यंत 15 ते 16 धोरणे लागू केली असून, या धोरणांमुळे गुंतवणूकदारांसाठी सक्षम आणि विश्वासार्ह इकोसिस्टीम तयार झाली असल्याचेही ते म्हणाले.
स्टार्टअप्स, एआय आणि भविष्यातील तंत्रज्ञान
आजच्या काळात स्टार्टअप्स अवघ्या 3-4 वर्षांत युनिकॉर्न होत असून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा, फ्रंटियर टेक्नॉलॉजीज या क्षेत्रांमध्ये भारत, विशेषतः महाराष्ट्र आघाडी येण्याच्या स्पर्धेत अग्रेसर आहे. एवढेच नाही तर, महाराष्ट्रात देशातील 60 टक्के डेटा सेंटर क्षमता असून, महाराष्ट्र आता भारताची ‘डेटा सेंटर कॅपिटल’ बनले आहे. हरित ऊर्जेवर आधारित, उच्च दर्जाची वीजपुरवठा व्यवस्था उभारून ही क्षमता आणखी वाढवली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.












