Solapur Zilla Parishad : सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच सत्तेचा दावेदार ठरलेल्या भाजपने धक्कातंत्र अवलंबल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद पहिल्यांदाच महिला राज आणण्याची तयारी असल्याचे भाजपच्या सूत्राने सांगितलय, जिल्हा परिषदेसाठी झालेल्या नुकत्याच निवडणुकीत भाजपने 68 पैकी 38 जागा घेऊन बहुमत प्रस्थापित केले आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला एक हाती सत्ता मिळाली आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत भाजप मोठ्या धक्कातंत्राच्या तयारीत असल्याचे सांगण्यातद येत आहे. त्यामुळे कोणाचा गेम होणार, आणि कोणाला नशीब अजमवणार हे वेळच सांगेल.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत गटात या आरक्षणावर निवडून आलेल्या दावेदारांची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली आहे. असे असले तरी भाजपने एक वेगळाच धक्कातंत्र देण्याचे नियोजन सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे सर्व पदाधिकारी महिला असतील असे सांगितले जात आहे. त्यामुळे साहजिकच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती पदावर महिला विराजमान होण्याचे संकेत आहेत. अध्यक्ष पदासाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्यानशेट्टी, तर उपाध्यक्ष पद बार्शीच्या दराडे यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समाजकल्याण पदासाठी संस्कृती सातपुते यांच्या नावाची चर्चा
या दोन्ही पदानंतर दहा विषय समित्यांचा नंबर लागतो. त्यात समाजकल्याण पदासाठी माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांच्या नावाची चर्चा असून महिला व बालकल्याणसाठी करमाळा येथील रश्मी बागल यांच्या नावाची वर्णी लागू शकते सोबतच मिनी मंत्रालयात अर्थ व बांधकाम समितीचे खाते वजनदार मानले जाते, तसे पाहिले तर ही खाती उपाध्यक्ष यांच्याकडे असतात. पण यापूर्वी विजयराज डोंगरे यांनी ही खाते आपल्याकडे घेतली होती. पण आता भाजपच्या राजवटीत ही खाती पुन्हा उपाध्यक्षाकडे जाणार आहेत. त्यामुळे उपाध्यक्ष यांच्याकडे यापूर्वी असलेली शिक्षण व आरोग्य खाती कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू आहे.
जयकुमार गोरे यांनी सत्ता आणण्यासाठी किंगमेकरची भूमिका
स्थायी व जलव्यवस्थापन ही खाती अर्थात अध्यक्षांकडेच असणार आहेत. कृषी व पशुसंवर्धन विभागाकडे आता सेस फंडाशिवाय काही राहिलेले नाही त्यामुळे या खात्यांवर नाममात्र सभापती येणार आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेत सत्ता आणण्यासाठी किंगमेकरची भूमिका पार पाडली आहे त्यामुळे साहजिकच त्यांच्या शिफारशीवरूनच पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत.आतापर्यंत समोर आलेल्या नावांवरून व भाजपची रणनीती पाहिल्यास जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच वेगळे चित्र पहावयस मिळणार आहे.











