Sushma Andhare On Ashok Kharat | आज एक भीषण अपघात घडला आहे. छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी रस्त्यावरील धोत्रे गावाजवळ भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) जवळच्या सहकाऱ्याचा मोठा अपघात झाला आहे. अशोक खरातचा जवळचा सहकारी आणि शिवानिका ट्रस्टचे संचालक, उपाध्यक्ष जितेंद्र शेळके (Jitendra Shelke) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात शेळकेंसह त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर या अपघातात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हेही वाचा – वाल्मिक कराडची अचानक तब्येत खालावली; तातडीने रुग्णालयात केले दाखल, नेमकं झालं काय?
अशोक खरातबाबत काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
जितेंद्र शेळके यांचा भीषण अपघात झाला असून यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर जितेंद्र शेळकेंच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे. शेळकेंच्या या अपघातानंतर आता खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशी भीती सध्या व्यक्त करण्यात येत आहेत. यामध्ये आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी खळबळजनक ट्विट करत मोठा दावा केला आहे.
सुषमा अंधारेंनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटलं आहे की, खरात प्रकरणातील शिवनीका ट्रस्टचे संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. मला ही गोष्ट अविश्वसनीय वाटत आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी जी शक्यता आणि भीती वर्तवली होती की, खरातच्या जीवाला धोका असू शकतो. तर आज जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळकपणे अधोरेखित केलं जात आहे, असं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.
खरात प्रकरणातील शिवनीका ट्रस्टचा संचालक शेळके याचा अपघाती मृत्यू धक्कादायक आहे.
खरात चा एन्काऊंटर होऊ शकतो ही अनेकांनी व्यक्त केलेली शंका यानिमित्ताने अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे. pic.twitter.com/Z78P9TfDr2
— SushmaTai Andhare (@andharesushama) April 17, 2026
पुढे त्या म्हणाल्या की, कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नये असं काही लोकांना वाटत आहे का? आणि असं असेल तरीही एसआयटी अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकश्या होत नसतील, तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललं आहे. शेळके हा गुन्हेगार होता की नव्हता? हे कायद्यानं ठरवलं असतं आणि शिक्षाही कायद्याने दिली असती. मात्र कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण जी घटना आज घडली आहे ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे एवढं नक्की आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.











