Trupti Desai On Rupali Chakankar | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच अनेकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) त्याला अटक केली आहे. तर याच भोंदू खरातचे संबंध अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत होते. यामध्ये रूपाली चाकणकरांचे (Rupali Chakankar) आणि खरातच्या कुटुंबाचे जवळचे संबंध होते. त्यामुळे सध्या रूपाली चाकणकर आणि त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) चांगल्या अडचणीत आल्या आहेत.
हेही वाचा – बिहारमध्ये सत्तांतर! सम्राट चौधरी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; जेडीयूचे दोन उपमुख्यमंत्री नियुक्त
खरात प्रकरणावर रूपाली चाकणकरांची पोस्ट
रूपाली चाकणकर यांनी खरात प्रकरणावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. “अशोक खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीव व्यवहारात किंवा कोणत्याही दुष्कृत्यात आमचा संबंध नाही. शेवटी सत्य समोर येईल हा माझा दृढ विश्वास आहे”, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. तर रूपाली चाकणकर यांच्या या पोस्टवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
तृप्ती देसाईंनी चाकणकरांवर काय केले आरोप?
तृप्ती देसाई यांनी रूपाली चाकणकरांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “मागील 28 दिवस रूपाली चाकणकर या झोपल्या होत्या का? त्यांना आता कशी काय जाग आली? त्यांची प्रतिमा जर मलीन झाली असेल तर त्यांनी समोर येऊन खुलासा करणे गरजेचं होतं. एवढ्या दिवस त्या गायब का होत्या? असे सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केले आहेत.
पुढे त्या म्हणाल्या की, “रूपाली चाकणकर, त्यांच्या बहिण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब हे खरातचे भक्त होते. या प्रकरणाचून प्रतिक्षा चाकणकर स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. खरातला विलन ठरवून त्या स्वत:ला हिरो दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आरोपही तृप्ती देसाई यांनी केले आहेत. तृप्ती देसाई यांनी केलेल्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.












