Court Parking Gang Rape : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न रोज गंभीर बनत चालला आहे. आता एक समोर आलेल्या घडनेमुळे तर कायद्याचा धाक संपला आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये एका विवाहित महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. चांगली नोकरी देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी पीडितेचा विश्वास संपादन केला होता. या घटनेच्या तीन महिन्यानंतर बदनामी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडितेने हिंमत दाखवत अखेर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यावेळी पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी हिरालाल केदार याला बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरा आरोपी रवी पवार अद्याप फरार असून पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके त्याचा कसून शोध घेत आहेत. अटक झालेला एक आरोपी युट्युब पत्रकार म्हणून मिरवत होता. न्यायालयाच्या आवारातच अशी गंभीर घटना घडल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर आणि महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हेही वाचा – पुण्यात 8 कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या दोघांना अटक; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
घटना नेमकी कशी घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने सोशल मीडियावर कामासंदर्भातील एक जाहिरात पाहिली होती. एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या आशेने तिने त्या नंबरवर संपर्क साधला. आरोपी हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी तिचा विश्वास संपादन करत तिला ठाण्यातील एका स्पा सेंटरमध्ये नोकरी मिळवून दिली. २५ ऑगस्टला रात्री ८.३० च्या सुमारास आरोपींपैकी एकाने स्पा सेंटरमध्ये जाऊन पीडितेकडून मसाज करून घेतला. त्यानंतर आज माझा वाढदिवस आहे, केक कापायचा आहे असं सांगून त्यानं पीडितेला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये बोलावलं.
ठाणे फॅमेली कोर्टाच्या पार्किंगमध्ये घडली घटना..
यानंतर आरोपींनी ही कार थेट ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारातील एका अंधाऱ्या पार्किंगमध्ये नेली. तिथे केक कापताना त्यांनी त्यामध्ये आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. हा केक खाल्ल्यानंतर पीडित महिलेची शुद्ध हरपली. याच संधीचा फायदा घेत गाडीतील दोन्ही आरोपी हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तसेच याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं.
व्हिडीओचा आधार घेत ब्लॅकमेलिंग
यानंतर रात्री ११ वाजता आरोपींनी पीडितेला रस्त्यावर सोडून दिलं. तसचं याबद्दल कोणाला काही सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी दिली. यानंतर बदनामीच्या आणि व्हिडीओ व्हायरल होण्याच्या भीतीने पीडितेने तब्बल तीन महिने हे दुःख मनात दाबून ठेवले. मात्र आरोपींनी या व्हिडीओचा आधार घेत तिला सातत्याने ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवलं. मात्र आरोपींचा मानसिक आणि शारीरिक त्रास असह्य झाल्यानंतर अखेर पीडित महिलेने ५ डिसेंबर २०२५ रोजी एका वकील आणि मैत्रिणीच्या मदतीने ठाणे नगर पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण आपबिती पोलिसांना सांगितली.












