Hotels Shutdown | अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशात गॅस संकट निर्माण झाले आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे (Gas Shortage) सरकारने राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. मात्र, आता सरकारने हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. स्वयंपाकघरे चालू ठेवण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे.
सरकारने काय केली घोषणा?
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅसची सद्यस्थिती तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांवर होणारा परिणाम याबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
आजपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटमधील स्वयंपाकघरे चालू ठेवण्यासाठी व्यावसायिकांना त्यांच्या सरासरी मासिक व्यावसायिक एलपीजी गॅसच्या गरजेच्या अंदाजे 20 टक्के कोटा दिला जाणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सरकारकडून व्यावसायिकांना अतिरिक्त गॅस पुरवठा करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. गॅस टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी आणि व्यावसायिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालय उद्योग भागधारकांसोबत संपर्कात आहेत.
दरम्यान, गॅसच्या कमतरतेमुळे केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅसला प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश तेल कंपन्यांना दिले आहेत. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. कारण राज्यात हॉटेलसाठी लागणारा 19 किलोच्या सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून हॉटेल, रेस्टॉरंट बंद होण्याच्या मार्गावर आले आहेत.
गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील अनेक हॉटेल्सनी वडापाव, भजी, डोसा यांसारख्या पदार्थांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अंधेरी, दादरसारख्या भागांमधील अनेक हॉटेल्सनी आपले मेनू कमी करण्यास सुरूवात केली आहे. आता काही दिवस लोकांना हॉटेलमध्ये मोजकेच पदार्थ खाता येणार आहेत.
गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत ‘आहार’चे अध्यक्ष विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठी माहिती दिली. मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना मोठा फटका बसला आहे. तसेच आता 20 टक्क्यांपर्यंत आलेले हे प्रमाण आता 60 टक्क्यांवर येण्याची शक्यता असून मुंबईतील 100 टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबतचे पत्र केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही संपर्क साधला आहे, अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली.












