Unseasonal Rain | सध्या उत्तर भारतातील राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. दुसरीकडे, ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) पडत आहे. हवामान विभागाने आज देशातील 12 राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ज्या राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे, तिथे ताशी 65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ज्या राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे, त्या राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा यांचा समावेश आहे. त्याच वेळी, आज दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात ईशान्य आणि पूर्व भारताच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता आहे. तसेच अनेक दिवस ईशान्य भारतात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता
23 ते 25 एप्रिल दरम्यान कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. तसेच 23 ते 24 एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये पुढील दोन दिवस तीव्र सूर्यप्रकाश राहील आणि उष्णतेची लाट येऊ शकते. तर उत्तर प्रदेशात पुढील चार दिवस, राजस्थानमध्ये पुढील तीन दिवस, मध्य प्रदेशात पुढील तीन दिवस, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये पुढील चार दिवस आणि पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज दिल्लीसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागांमध्ये आज कडक ऊन आणि उष्णतेची लाट येऊ शकते.











