Unseasonal Rain | गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात बदल होताना दिसत आहेत. एकिकडे कडक उन्हाळ्याचे (Summer) दिवस सुरू झाले असताना दुसरीकडे मात्र काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होताना दिसत आहे. यामध्ये मागील काही दिवसांपूर्वीच मराठवाडा (Marathwada), परभणी (Parbhani) या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावली होती, ज्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तर आताही हवामान विभागानं मोठा इशारा दिला. राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हेही वाचा – जळगावमध्ये महायुतीतील 2 पक्ष पोलीस ठाण्यातच भिडले, सेना-भाजपात तुफान हाणामारी
कोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता?
राज्यातील काही जिल्ह्यांध्ये आज मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाड्यासोबत मध्य महाराष्ट्राला सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यांसाठी आजचा दिवस धोक्याचा असणार आहे.
हवामान विभागानं बीड, चंद्रपूर, धाराशिव, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या भागांना हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती, तर आताही या भागांमध्ये पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान खात्यानं दिले आहेत.
रब्बी पिकांचे मोठे नुकसान
अवकाळी पावसामुळे मराठवाडा, विदर्भ या भागांमधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे आणि अवकाळी पावसामुळे अनेक आंबा उत्पादकांनाही मोठा फटका बसला आहे. तर आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे हवामान खात्यानं अवकाळी पावसाचा इशारा 20 मार्च 2026 पर्यंत दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना सतर्क राहावं लागणार आहे.
दरम्यान,अनेक शहरांमध्ये उन्हाचा पारा 40 अंशावर पोहाचला आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिक उकाड्याने हैराण झाल्याचं पहायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर डॉक्टरांनी दुपारच्या वेळी जर काम नसेल तर बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. एकिकडे राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत असताना दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यामुळे अनेक जिल्हांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.












