Nitish Kumar | मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) हे नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. तर आताही ते पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. बेगूसराय येथील कार्यक्रमात नितीश कुमार यांच्या वक्तव्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. तसेच या कार्यक्रमात ते महिलांवर संतापलेले देखील दिसले. त्यामुळे नितीश कुमार यांच्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा – “कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर…”, नितेश राणेंचा थेट इशारा, लव्ह जिहादबाबत केलं मोठं वक्तव्य
नितीश कुमार महिलांवर का संतापले?
नितीश कुमार हे शनिवारी समृद्धी यात्रेच्या निमित्ताने बेगूसराय येथे पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते 376 कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. तर बरौनी ब्लॉकमधील बियाडा संकुलात आयोजित कार्यक्रमामध्ये नितीश कुमार यांनी जनतेला संबोधित केले.
या कार्यक्रमादरम्यान काही महिला मधूनच उठून निघाल्या होत्या. हे पाहताच नितीश कुमार संतप्त झाले आणि महिलांना संबोधित करत म्हणाले की, “अरे कुठे चालला आहात? कार्यक्रम मी बंद करू का? मी पाहिलेलं आधीही तिकडून लोकं जात होती. जर सगळ्यांनाच निघून जायचं असेल तर आम्ही देखील भाषण करायचं सोडून देतो. इथे शांत बसून ऐका, तुम्हाला सर्व काही सांगितलं जात आहे मग तुम्हाला एवढी घाई कशाची आहे? असं संतप्त होत नितीश कुमार म्हणाले. नितीश कुमारांच्या या विधाननंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
पुढे भाषण झाल्यानंतर नितीश कुमारांनी उपस्थित असलेल्या लोकांना एक मिनिटे थांबण्याची विनंती केली. ते म्हणाले की, जरा एक मिनिट थांबा आणि पुढे जात सम्राट चौधरी यांच्याजवळ गेले. सम्राट चौधरी यांचा हात त्यांनी हातात धरला आणि दोघांनी मिळून उपस्थित जनतेला अभिवादन केले.
नितीश कुमार आणि सम्राट चौधरी यांच्या या कृतीनंतर उपस्थितांमध्ये जोरादार चर्चा सुरू झाली होती. तर बऱ्याच लोकांनी राजकारणाशी जोडून तर्क वितर्क लावण्यास सुरूवात केली आहे. उपस्थित लोकांसोबतच आता राजकीय वर्तुळात देखील जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, एकिकडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेत प्रवेश करणार असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे त्यांचे पुत्र निशांत कुमार हे जेडीयू पक्षात सामील झाले आहेत. 8 मार्च रोजी निशांत कुमार यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.












