पाटणा Nitish Kumar Resign : नितीश कुमार यांनी 14 एप्रिल रोजी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, यासोबतच बिहारच्या राजकारणातील जवळपास दोन दशकांच्या एका पर्वाचा अंत झाला आहे. राज्यसभेवर निवडून आल्यानंतर, त्यांनी आता केंद्रीय राजकारणात प्रवेश केला आहे.
हेही वाचा : नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? नावही ठरलं
नितीश यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा :
बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार (nitish kumar) यांनी लोक भवन (राजभवन) इथं राज्यपाल सय्यद अता हसनैन यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. राज्यपालांनी नितीश कुमार यांचा राजीनामा स्वीकारला असून, यासोबतच बिहारमधील “नितीश युगाचा” अंत झाला आहे.
शेवटची मंत्रिमंडळ बैठक :
राजीनामा देण्यापूर्वी, नितीश कुमार यांनी पाटणा इथं आपली शेवटची मंत्रिमंडळ बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी “मी राजीनामा देणार आहे,” अशी घोषणा केली. हे ऐकून बैठकीत उपस्थित असलेले नितीश कुमार यांच्या पक्षाचे सर्व नेते भावूक झाले. मंत्री लेशी सिंह माध्यमांशी बोलताना भावनावश झाले. मंत्री रामकृपाल यादव म्हणाले, “आज सर्वजण भावूक झाले होते, सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते.”
नितीश कुमार यांची सोशल मीडियावर पोस्ट :
राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमारांनी पोस्ट करत लिहिलं “आम्ही बिहारच्या लोकांसाठी खूप काम केले आहे. आम्ही इतके दिवस अविरतपणे त्यांची सेवा केली आहे. आम्ही मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता आणि म्हणूनच, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मी राज्यपालांना भेटून माझा राजीनामा सादर केला. आता, येथे एक नवीन सरकार कारभार हाती घेईल. नवीन सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आणि मार्गदर्शन असेल. भविष्यातही उत्तम काम सुरू राहील आणि बिहार लक्षणीय प्रगती करेल. मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.”
41 वर्षांची संसदीय कारकीर्द :
75 वर्षीय नितीश कुमार गेल्या 41 वर्षांपासून संसदीय राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आमदार म्हणून केली, त्यानंतर ते लोकसभा खासदार आणि केंद्रात विविध विभागांचे मंत्री राहिले. ते 2000 साली पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले, पण काही दिवसांतच त्यांना पायउतार व्हावं लागलं. 2005 मध्ये सत्तेवर आल्यापासून त्यांनी हे पद सतत भूषवलं आहे (2014-15 मधील नऊ महिन्यांचा अपवाद वगळता, जेव्हा जितन राम मांझी मुख्यमंत्री होते).












