Ashok Kharat Case | नाशिकच्या (Nashik) भोंदू ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणातून दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातने अनेक विवाहित महिलांवर, तरूणींवर अत्याचार करत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. तर भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक बड्या नेत्यांसोबत, बड्या उद्योगपतींसोबत चांगले संबंध होते. त्यामुळे अशोक खरातचा खरा चेहरा समोर येताच राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
अशोक खरात प्रकरणावरून संजय राऊतांचे गंभीर आरोप
अशोक खरात प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही बड्या नेत्यांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत. भोंदूबाबा अशोक खरातपेक्षा त्याला प्रतिष्ठा देणारे राजकारणी अधिक मोठे गुन्हेगार आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊतांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाली की, सरकारने अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या 40 आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या नावाची यादी तातडीनं जाहीर करावी. जर सरकार खरातच्या मागे नसतं तर जे 40 आमदार, खासदार आणि मंत्री आहेत जे खरातची सेवा करायला जात होते त्यांच्या नावाची यादी सरकारनं जाहीर केली असती.
खरात प्रकरणात संजय राऊतांनी कोणत्या नेत्यांच्या नावाचा केला उल्लेख?
भोंदूबाबा अशोक खरात गुन्हेगार आहेच. पण सोबतच त्या भोंदुबाबाच्या चरणाशी जाऊन त्याची सेवा करणारे, त्याची स्तुती करणारे राज्यकर्ते अधिक अपराधी आहेत. त्यामुळे या सर्वांची यादी जाहीर करायला हवी, अशी मागणी संजय राऊतांनी केली.
पुढे ते म्हणाले की, ज्याप्रमाणे गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांना सह-आरोपी केले जाते तसेच खरातला भेटणाऱ्या नेत्यांची चौकशी व्हायला हवी. रूपाली चाकणकरांना चौकशीसाठी बोलवलं का? दीपक केसरकरांना चौकशीला बोलवलं का? तटकरेंना चौकशीला बोलवलं का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चौकशीसाठी बोलवलं का? असा संतप्त सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
या सर्व नेत्यांना एकदा विचारा की तुम्ही खरातकडे गेला होता का? तुम्ही तिथे जाऊन कोणते विधी केले? त्यातून तुम्हाला काय फायदा झाला? खरातला किती पैसे दिले? आणि ते पैसे कुठून आणले? जर पोलिसांना प्रश्नावली काढण्यात अडचणी येत असतील तर मी त्यांना प्रश्न काढून देतो. तसेच जर सरकार खरातच्या पाठीशी नसेल तर अमित शाहांपर्यंत खरात कसा काय पोहोचला? चंद्रकांत पाटलांपर्यंत खरात कसा पोहोचला? असे खळबळजनक सवालही संजय राऊतांनी केले. अशोक खरात प्रकरण एका गुन्ह्यापुरते मर्यादित नसून ते महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेशी संबंधित आहे, असंही संजय राऊत म्हणाले.












