Trupti Desai | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. अशोक खरातने अनेक महिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. तर याच भोंदुबाबा अशोक खरातचे संबंध अनेक राजकीय नेत्यांसोबत, उद्योगपतींसोबत होते. खरातला भेटण्यासाठी बरेच राजकीय नेते भेटायला यायचे अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये दीपक केसरकर (Deepak Kesarkar), रूपाली चाकणकर (Rupali Chakankar), सुनील तटकरे (Sunil Tatkare), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नावे समोर आली आहेत. तर आता खरात प्रकरणात विधानपरिषदेच्या उपसभापती, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांचं नाव समोर आलं आहे.
हेही वाचा – अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट! आता आर्थिक कुंडली उघडणार, ‘ती’ व्यक्ती पोलिसांच्या निशाण्यावर
तृप्ती देसाईंनी नीलम गोऱ्हेंवर काय केले आरोप?
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी खरात प्रकरणावरून नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “अशोक खरातला नीलम गोऱ्हे या अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. खरातने नीलम गोऱ्हेचं भविष्य सांगितलं आहे. तर कोरोनापूर्वी नीलम गोऱ्हेंनी खरातची भेट घेतली होती. धक्कादायक बाब म्हणजे आमदारकी मिळावी यासाठी निलम गोऱ्हे या खरातला भेटल्या होत्या, असे गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केले आहेत.
नीलम गोऱ्हे या मंत्रीपद मिळावं म्हणून आपलं भविष्य बघण्यासाठी अशोक खरातकडे गेल्या होत्या. तर कोरानाच्या आधी नाशिकमधील एक्स्प्रेस इन नावाचं जे हॉटेल आहे तिथे निलम गोऱ्हे या मुक्कामी राहिल्या होत्या. त्या हॉटेलमध्ये गोऱ्हेंचं भविष्य सांगण्यासाठी अशोक खरात त्यांना भेटायला गेला होता. या भेटीदरम्यान निलम गोऱ्हेंसोबत जी व्यक्ती होती त्या व्यक्तीनेच मला ही माहिती पुण्यामध्ये येऊन दिली आहे, असा मोठा गौप्यस्फोट तृप्ती देसाई यांनी केला.
पुढे त्या म्हणाल्या की, कदाचित नीलम गोऱ्हे यांना अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांबाबतची माहिती नसेल. मात्र, आता खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्यानंतर नीलम गोऱ्हेंनी त्याच्याविरोधात आवाज का नाही उठवला? त्या खरातला भेटल्या होत्या याबाबतची माहिती त्यांनी का दिली नाही? असे सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केले.
महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा आला की निलम गोऱ्हे त्यावर आपलं मत लगेच मांडतात. त्यावर जाहीरपणे बोलत प्रेस नोट काढतात. मग आत्ता अशोक खरात प्रकरण बाहेर आलं, अख्खं अधिवेशन पार पडलं ज्यामध्ये निलम गोऱ्हे उपसभापती आहेत. तिथे त्या खरात प्रकरणावर एक शब्दही बोलल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची दखल घेतली. तरीही गोऱ्हे या प्रकरणावर काहीच का बोलल्या नाहीत? असा सवालही तृप्ती देसाईंनी केला.












