Nitish Kumar Resignation | बिहारच्या (Bihar) राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कारण मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी आज बिहार विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांची नुकतीच राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे नियमानुसार त्यांना राज्य विधिमंडळातील आपल्या जागेचा त्याग करावा लागला आहे. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – शिवतीर्थावर गुप्त बैठक! पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
नितीश कुमारांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार?
नितीश कुमार यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तर जरी नितीश कुमार यांनी राजीनामा दिला असला तरी तांत्रिकदृष्ट्या ते मुख्यमंत्री पदावर कायम राहतील. कारण भारतीय राज्यघटनेतील तरतुदींनुसार, जर एखादी व्यक्ती राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाची सदस्य नसेल तरीही ती व्यक्ती सहा महिन्यांपर्यंत मुख्यमंत्रीपद किंवा अन्य कोणतेही मंत्रीपद भूषवू शकते. त्यामुळे नितीश कुमार यांनी जरी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी ते सहा महिन्यांपर्यंत मुख्यमंत्रीपद भूषवू शकतात.
#WATCH | Patna: Bihar Chief Minister Nitish Kumar resigns as Member of the Legislative Council (MLC) following his elections as a Member of the Rajya Sabha (MP). pic.twitter.com/kmoLHotWXE
— ANI (@ANI) March 30, 2026
एकिकडे नितीश कुमार यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे तर दुसरीकडे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नितीन नवीन यांचीही राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा सादर करत नितीन नवीन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “मागील 20 वर्षांपासून मी बिहारच्या विकासासाठी आणि माझ्या मतदारसंघासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये सहभाग घेता आला”, असं नितीन नवीन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये नितीश कुमार आणि नितीन नवीन हे दोन्ही नेते नवीन संसदेच्या वरिष्ठ सभागृहात शपथ घेतील. त्यामुळे बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा नवा चेहरा कोण असणार? आणि मंत्रिमंडळात काय नवीन फेरबदल होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












