Sanjay Raut | महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या बुधवारी (1 एप्रिल) रात्री अचानक दिल्ली (Delhi) दौऱ्यावर गेल्या आहेत. तर सुनेत्रा पवार काँग्रेस नेत्यांना आणि एनडीएच्या नेत्यांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक दावा केला आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत काय म्हणाले संजय राऊत?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादी पक्षाचं विलिनीकरण हे भाजपमध्ये होणार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकारणात मोठा बदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकिकडे सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा आणि दुसरीकडे संजय राऊतांनी केलेला दावा, यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भविष्यात 25 ते 30 आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन होईल. भाजप पक्षात राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला विलीन व्हावेच लागेल, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे संजय राऊतांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही भाष्य केलं. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते अजित पवारांचे जवळचे सहकारी होते. मात्र, आता ते सुनेत्रा पवारांचे सहकारी नाहीयेत, असंही संजय राऊत म्हणाले. राऊतांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघातानंतर 16 फेब्रुवारी 2026 रोजी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या घटनेत बदल केले होते. पक्षाच्या घटनेत बदल करून सर्व अधिकार अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांकडे द्यावेत, असं पत्र तटकरे आणि पटेलांनी निवडणूक आयोगाला दिले होते. तर याबाबतची माहिती सुनेत्रा पवारांना समजताच त्यांनी हे सर्व पत्र व्यवहार अमान्य समजावेत, असं निवडणूक आयोगाला पत्राद्वारे कळवलं होतं. त्यानंतर तटकरे आणि पटेलांनी पक्षाच्या घटना बदलाबाबत सुनेत्रा पवारांना स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, सुनेत्रा पवार या तटकरे आणि पटेलांच्या स्पष्टीकरणावर असमाधानी असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष हायजॅक करण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. यामध्ये विरोधकांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.












