Indias LPG Consumption : भारतात स्वयंपाकाच्या गॅसबद्दलची चिंता वाढत असल्याचं दिसते. मार्च महिन्यात एलपीजीच्या वापरात लक्षणीय 13% घट झाली. या घटीचं मुख्य कारण म्हणजे पश्चिम आशियातील सध्याचा तणाव आणि त्यामुळं निर्माण झालेला पुरवठ्यातील व्यत्यय. याचा थेट परिणाम सार्वजनिक स्वयंपाकघरं आणि हॉटेल्स व रेस्टॉरंट्ससारख्या व्यवसायांवर झाला आहे.
हेही वाचा : अक्षय्य तृतीच्या मुर्हूतावर सोने-चांदीचा भाव काय? पाहा ताजे दर
एलपीजीचा वापर घसरला :
सरकारी आकडेवारीनुसार मार्च 2026 मध्ये एलपीजीचा वापर 2.379 दशलक्ष टनांपर्यंत घसरला, जो मागील वर्षाच्या तुलनेत 12.8 टक्के घट दर्शवतो. घरगुती सिलेंडरच्या वापरातही 8.1 टक्के घट झाली, तर व्यावसायिक वापरात अंदाजे 48 टक्के घट दिसून आली. भारत आपल्या एलपीजीच्या गरजांपैकी अंदाजे 60 टक्के गरजांसाठी आयातीवर अवलंबून आहे, ज्यातील मोठा वाटा पश्चिम आशियातून येतो. मात्र, अलीकडील तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीमुळं पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, विशेषतः सागरी मार्गांमध्ये व्यत्यय आल्यानं गॅसची उपलब्धता कमी झाली आहे.
घरगुती गरजांना प्राधान्य :
परिस्थिती हाताळण्यासाठी, सरकारनं हॉटेल्स आणि उद्योगांसारख्या व्यावसायिक क्षेत्राला होणारा एलपीजी पुरवठा कमी केला आहे, जेणेकरुन घरगुती स्वयंपाकघरांमध्ये गॅसची कमतरता भासू नये. पेट्रोकेमिकल उत्पादनातून कच्चा माल वळवून एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश रिफायनरींनाही देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळं देशांतर्गत एलपीजी उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढून 1.4 दशलक्ष टन झालं आहे. असं असूनही, मागणी आणि पुरवठा यांचा समतोल साधणं हे एक आव्हानच राहिलं आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत वाढ :
विशेष म्हणजे एलपीजीचा वापर कमी झाला असताना, पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढली आहे. मार्चमध्ये पेट्रोलच्या विक्रीत 7.6 टक्के आणि डिझेलच्या विक्रीत 8.1 टक्के वाढ झाली. तज्ञांच्या मते, पश्चिम आशियामध्ये तणाव कायम राहिल्यास एलपीजी पुरवठ्यावर दबाव कायम राहू शकतो. याचा परिणाम भविष्यात किमती आणि उपलब्धता या दोन्हींवर होऊ शकतो.





