PM Narendra Modi | नुकतीच नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांच्यासोबत एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सामरिक भागीदारी अधिक दृढ करण्याची घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी जागतिक तणावाच्या काळात असलेली भारताची भूमिका देखील स्पष्ट केली आहे.
हेही वाचा – नाशिक TCS प्रकरण तापलं; कंपनीची निदा खानवर कडक कारवाई, नेमकं काय घडलं?
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?
मध्य-पूर्वेतील संघर्षाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जागतिक तणावाच्या या काळात भारत देश शांततेच्या बाजूने आहे. तणावाच्या या परिस्थितीत भारत आणि कोरिया शांतता व स्थैर्याला प्रोत्साहन देत आहेत, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
पुढे पंतप्रधान मोदींनी दक्षिण कोरिया आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि इंडो-पॅसिफिक महासागर उपक्रमात सामील होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, शांततापूर्ण, प्रगतीशील आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक प्रदेशाच्या उभारणीसाठी भारत आणि दक्षिण कोरिया हे दोन्ही देश एकत्र काम करत राहतील. तसेच महान कवी रवींद्रनाथ टागोर यांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, रविंद्रनाथ टागोर यांनी कोरियाला ‘पूर्वेचा दिवा’ म्हटलं होतं आणि आज कोरिया हा 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एक महत्त्वाचा भागीदार आहे.
जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले. तर दुसऱ्या एका निवेदनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि कोरिया पुढील दशकातील यशाचा पाया रचत आहेत. त्यांनी ‘भारत-कोरिया डिजिटल ब्रिज’ सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढेल. जहाजबांधणी, शाश्वतता, पोलाद आणि बंदरे यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये अनेक सामंजस्य करार केले जातील. तसेच चित्रपट, ॲनिमेशन आणि गेमिंग यांसारख्या सांस्कृतिक आणि सर्जनशील क्षेत्रांमध्येही सहकार्याला प्रोत्साहन दिले जाईल. पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, आज आयोजित केलेला हा व्यावसायिक मंच या संधींना ठोस परिणामांमध्ये रूपांतरित करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल.












