Bageshwar Shivaji Maharaj Statement : आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. हा वाद ताजा असतानाच त्यात बागेश्वर बाबाच्या वक्तव्याची भर पडली…. आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर त्यांनी अजून एका वादाला फोडणी दिली… बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं विधान वादाच्या भोवऱ्यात सापडलंय.. अनेकांनी या विधानाला शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची चुकीची मांडणी म्हटलंय.. हे विधान समोर आल्यानंतर बागेश्वर बाबांवर टीका होत असून, त्यांच्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.
शिवाजी महाराज युद्धाने धकले होते – बागेश्वर
आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपुरातील भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यावर भाष्य केले. “शिवाजी महाराज युद्धाने थकले होते आणि त्यांनी आपले राज्य समर्थांच्या चरणी अर्पण केले,” असे विधान बागेश्वर महाराज यांनी केलं..
छत्रपतींनी राज्य समर्थांच्या चरणी अर्पण केले
नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री बोलत होते. या दरम्यान त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, स्वामी रामदास महाराजांजवळ गेले, आता युद्ध लढणार नाही असं सांगितलं आणि राजपाट सांभाळण्यास सांगितलं.. रामदास स्वामींनी सांगितलं की, ‘ठीक आहे, आता हे राज्य माझे आहे. शिष्याचा धर्म आहे गुरुच्या आज्ञेचे पालन करणं. त्यामुळे माझी आज्ञा ऐका आणि माझ्या राज्याचे संचालन करा’” असे विधान केले. याच मुद्द्यांवरुन आता वाद पेटलाय…
मोहन भागवत, फडणवीस, गडकरींची कार्यक्रमाला उपस्थिती
या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि संत मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी आरएसएसचं कौतुकही केलं होतं..
“हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा अन् एक मूल संघासाठी समर्पित करावे
केवळ ऐतिहासिक संदर्भच नव्हे, तर महाराजांनी उपस्थित हिंदूंना दिलेला सल्लाही वादग्रस्त ठरत आहे. “हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा आणि त्यातील एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित करावे,” असे विधान त्यांनी केले. लोकसंख्या नियंत्रणावरून देशात राजकीय खडाजंगी सुरू असताना, एका धार्मिक व्यासपीठावरून असे आवाहन करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे…
महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड सहन केली जाणार नाही- वडेट्टीवार
विरोधकांनी या या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी सार्वजनिक मंचावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाबाबत केलेले वक्तव्य ऐतिहासिक सत्याशी विसंगत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. त्यांनी या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया देत महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच स्वतःला शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवर उपस्थित असताना असे वक्तव्य झाले, याकडेही वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. उपस्थितांपैकी कोणीही तत्काळ आक्षेप का घेतला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढल्याचे त्यांनी म्हटले.
व्हिडीओ सर्वत्र पसरू नये म्हणून कॉपीराईट फंडा
मात्र हा वाद आता आणखी तापणार आहे.. कारण बागेश्वर बाबा आधी शिवरायांबद्दल बरळला.. शिवरायांबद्दल केलेलं वादग्रस्त विधान जसं वाऱ्याच्या वेगानं पसरलं तसं बागेश्वर बाबावर चौफेर बाजून शिवप्रेमींकडून टीका केली जातेय… बागेश्वर बाबाच्या वक्तव्याचा व्हिडीओ वेगाने पसरत असल्याने घाबरलेल्या बाबाने आता कॉपीराईटचा खेळ सुरु केलाय… या व्हिडीओ आणखीन पसरु नये यासाठी व्हिडीओवर कॉपीराईट मारला जातोय.. बागेश्वर बाबाकडून तो व्हिडीओ ट्रीम करण्यात आलाय..त्यामुळे आता या प्रकरणावर बाबा पदडा टाकण्याचं काम करतोय..












