RBI Plastic Notes : भारतात कागदी नोटा अनेक वर्षांपासून चलनात आहेत, आता जरी युपीआय किंवा ऑनलाईन पेमेंटमुळे नोटांचा वापर कमी झाला असला तरी अजूनही ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागातही अनेक ठिकाणी मोठमोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी कागदी नोटांचा खूप मोठ्या प्रमाणांत वापर होत आहे. मात्र कागदी नोटा लवकर खराब होतात किंवा लवकर फाटण्याची आणि खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे आरबीआयने आता प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
जगातील पहिली प्लास्टिक नोट १९८८ मध्ये ऑस्ट्रेलियाने जारी केली होती. कागदी नोटा लवकर खराब होतात आणि बनावट नोटा बनवणे सोपे होते, या समस्येवर उपाय म्हणून ऑस्ट्रेलियाने हे तंत्रज्ञान शोधले. आज ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रोमानिया, व्हिएतनाम आणि युनायटेड किंडम यांसारख्या ३० हून अधिक देशांमध्ये पूर्णपणे प्लास्टिक चलन वापरले जाते.
आरबीआयने २००९ मध्ये पहिल्यांदा जाहीर केले
मात्र, भारतासाठीही हा विचार काही नवीन नाहीये. आरबीआयने २००९ मध्ये पहिल्यांदा जाहीर केले होते की, ते देशातील ५ वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर १० रुपयांच्या प्लास्टिक नोटा सुरू करणार आहेत. यासाठी कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या शहरांची निवडही करण्यात झाली होती. कारण या शहरांमधील हवामान अत्यंत भिन्न असते, कुठे खूप उष्णता, कुठे थंडी, तर कुठे जास्त दमट हवामान आहे.
पाच शहरांमध्ये 10 रुपयांच्या पॉलिमर नोटांची चाचणी
केंद्र सरकारने २०१२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात प्लास्टिकच्या नोटा छपाईवर विचार करण्यात आला होता, तत्कालीन मनमोहन सिंग सरकारचा पाच शहरांमध्ये 10 रुपयांच्या पॉलिमर नोटांची चाचणी करण्याचा प्लॅन होता पण, तांत्रिक आव्हाने आणि एटीएम-संबंधित समस्यांमुळे प्रकल्पात पुढे प्रगती झाली नाही. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. तंत्रज्ञानातील प्रगती आणि एटीएम मशीनमध्ये अशा नोटा स्वीकारण्याची सोय करता येत आहे त्यामुळे, या प्रायोगिक प्रकल्पाची औपचारिक घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
१००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटाही पॉलिमर
सध्याच्या माहिती नुसार, आरबीआयच्या पाटणा आणि मुंबई येथील केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकांमध्ये या विषयावर सविस्तर प्रेसेंटेशन करण्यात आले आहे. आरबीआय थेट सर्व नोटा प्लास्टिक करणार नाही. सर्वात आधी १० रुपयांच्या नोटा प्रायोगिक तत्त्वावर बाजारात आणल्या जाणार आहेत. या नोटा बाजारात आल्यानंतर सामान्य नागरिक त्या कशा हाताळतात, बाजारातील व्यवहारात त्या किती टिकतात, आणि भारतीय हवामानाचा त्यावर काय परिणाम होतो, याचे पुढील १ ते २ वर्षे बारकाईने निरीक्षण केले जाईल आणि हा प्रयोग यशस्वी जालाच तर तिथून पुढे १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटाही पॉलिमर म्हणजेच प्लास्टिकच्या आणल्या जाऊ शकतात.











