MPSC Mains 2026: MPSC मुख्य परीक्षेच्या गुणांवरून उमेदवारांमध्ये नाराजी वाढली आहे. एका पेपरमध्ये 121 गुण, तर त्याच विषयाच्या दुसऱ्या पेपरमध्ये अवघे 2 गुण मिळाल्याचा दावा समोर आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या गुणांवरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. विविध विषयांमध्ये मिळालेल्या गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा काही उमेदवारांनी केला असून, उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा अयोग अर्थात MPSC कडून यंदा राज्यसेवा मुख्य परीक्षा यूपीएससीच्या धर्तीवर लेखी पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेचे गुण जाहीर झाल्यानंतर काही उमेदवारांनी सोशल मीडियासह विविध माध्यमांतून आपले आक्षेप मांडले आहेत.
एकाच उमेदवारांच्या दोन पेपरमध्ये मोठा फरक
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, काही उमेदवारांना एका पेपरमध्ये समाधानकारक गुण मिळाले असताना त्याच विषयाच्या दुसऱ्या पेपरमध्ये अत्यंत कमी गुण मिळाले आहेत.
काही प्रकरणांमध्ये २५० गुणांच्या पेपरमध्ये एक अंकी गुण मिळाल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. एका उमेदवाराच्या भूगोल विषयातील एका पेपरला १२१ गुण मिळाले, तर दुसऱ्या पेपरमध्ये केवळ २ गुण मिळाल्याचा दावा केला जात आहे. तसंच फिलॉसॉफी आणि समाजशास्त्र यांसारख्या विषयांमध्येही काही उमेदवारांना अत्यल्प गुण मिळाल्याचे उदाहरणे समोर येत असल्याचे सांगितले जात आहे.
निबंध आणि सामान्य अध्ययनाच्या गुणांबाबतही प्रश्न
निबंधाच्या पेपरमध्ये उमेदवारांच्या गुणांमध्ये मोठी तफावत असल्याची तक्रार आहे. काही विद्यार्थ्यांना 150 पेक्षा अधिक गुण मिळाले, तर काहींच्या गुणांचा
आकडा त्यापेक्षा खूपच कमी असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्येही काही उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने मूल्यांकनाची पद्धत नेमकी काय होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर तपासणीमध्ये घोळ असल्याबाबत विद्यार्थ्यांचे म्हणणे असून अनेक विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये अगदी २, ४, ६ इतके नगण्य गुण देण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. याबाबतही MPSC च्या सचिवांसोबत चर्चा झाली आणि याची त्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी करणार असल्याचं… pic.twitter.com/rdfrm1UnzT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 1, 2026
ऑप्शनल विषय ठरतोय चर्चेचा केंद्रबिंदू
मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयांच्या दोन पेपरमधील गुणांमध्ये असलेली तफावत हा सध्या विद्यार्थ्यांच्या चर्चेचा प्रमुख मुद्दा आहे. काही उमेदवारांना एका वैकल्पिक पेपरमध्ये चांगले गुण मिळाले असताना दुसऱ्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात कमी गुण मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही पेपरच्या मूल्यांकनामध्ये इतका फरक का पडला, याचे स्पष्टीकरण आयोगाकडून मिळावे, अशी मागणी केली जात आहे.
क्वालिफाईंग पेपरमुळे काही उमेदवारांना फटका?
मराठी आणि इंग्रजी या पात्रता विषयांच्या पेपरबाबतही काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतर विषयांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही पात्रता पेपरमध्ये आवश्यक गुण मिळाले नसल्यामुळे काही उमेदवार पुढील प्रक्रियेतून बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे.
काही उमेदवारांना निर्धारित पात्रता गुणांपेक्षा कमी गुण मिळाल्याने मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचता आले नसल्याचा दावा केला जात आहे.
आयोगाकडून स्पष्टीकरणाची मागणी
गुणांमध्ये दिसणारी ही तफावत नेमकी कशामुळे निर्माण झाली, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन कोणत्या निकषांवर करण्यात आले आणि गुणांची फेरतपासणी किंवा पुनर्मूल्यांकनाची काही व्यवस्था आहे का, याबाबत विद्यार्थ्यांना स्पष्ट माहिती हवी आहे. दरम्यान, MPSCच्या परीक्षांबाबत यापूर्वीही पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे यावेळी मुख्य परीक्षेच्या गुणांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे आयोगाच्या पारदर्शकतेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी केलेले हे आरोप आणि गुणांबाबतचे दावे यावर आयोगाची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.



