नवी दिल्ली Exit Poll : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये पश्चिम बंगाल हे सर्वाधिक चर्चेत असलेलं राज्य आहे. या राज्यात इतिहासात पहिल्यांदाच सरकार स्थापन करण्याच्या तयारीत भारतीय जनता पार्टी (भाजपा) दिसत आहे, मात्र त्यांना सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून कडवी झुंज मिळत आहे. दरम्यान, आसाममध्ये भाजपाची आघाडी, तामिळनाडूमध्ये डीएमकेचं पुनरागमन आणि केरळमध्ये सत्तापालटाचे संकेत मिळत आहेत. हे अंदाज एक्झिट पोलवर आधारित असून, या सर्व राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे प्रत्यक्ष निकाल 4 मे रोजी जाहीर केले जातील.
हेही वाचा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प म्हणजे काय? कसं पडलं
बंगालमध्ये काय स्थिती :
अनेक एक्झिट पोलनुसार, यावेळी पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता आहे. भाजपाला 146 ते 161 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागांवर समाधान मानावं लागू शकते. इतर पक्षांना 6 ते 10 जागा मिळू शकतात. जर 4 मे रोजीचे निकाल खरे ठरले, तर भाजपा पहिल्यांदाच स्वबळावर सरकार स्थापन करु शकते.
बंगालमधील एक्झिट पोलची आकडेवारी :
- पी-मार्क : भाजपा 150-175, टीएमसी 118-138, इतर 2-6
- पोल डायरी : भाजपा 142-172, टीएमसी 99-127, इतर 5-9
- चाणक्य स्ट्रॅटेजी : भाजपा 150-160, टीएमसी 130-140, इतर 6-10
- पीपल्स पल्स : टीएमसी 177-187, भाजपा 95-100, इतर 1-4
आसाममध्ये भाजपाची सत्ता :
पश्चिम बंगालच्या शेजारी असलेल्या आसाममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या निकालांनुसार, भाजपा जोरदार पुनरागमन करताना दिसत आहे. आसाममध्ये भाजपाला 45.5% मते मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला सुमारे 40% मतं मिळण्याचा अंदाज आहे. जागांच्या बाबतीत, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला 85 ते 95 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला 25 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतर पक्षांना 6 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
आसाममधील एक्झिट पोल :
- ॲक्सिस माय इंडिया : भाजपा 88-100, काँग्रेस 24-36
- पीपल्स पल्स : भाजपा 68-72, काँग्रेस 22-26
- व्होट व्हाइब : भाजपा 90-100, काँग्रेस 23-33
- जेव्हीसी : भाजपा 88-101, काँग्रेस 23-33
तामिळनाडूची परिस्थिती काय :
तामिळनाडूतील एक्झिट पोलनुसार, तामिळ सुपरस्टार विजय यांचा पक्ष अनपेक्षित निकाल लावण्याच्या तयारीत आहे. 234 जागा असलेल्या तामिळनाडूमध्ये, DMK+ आघाडीला बहुमतापेक्षा जास्त, म्हणजेच 122 ते 132 जागा मिळू शकतात. त्याच वेळी, AIADMK+ आघाडीला 87 ते 100 जागा मिळू शकतात. विजय यांच्या नवीन पक्ष TVK ला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचx झाल्यास, DMK+ ला सुमारे 40%, AIADMK ला 37% आणि TVK ला सुमारे 17% मतं मिळू शकतात. मात्र, AXIS MY INDIA च्या एक्झिट पोलमध्ये, TVK ला सर्वात मोठा पक्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे आणि त्यांना 98 ते 120 जागा मिळू शकतात, तर DMK ला 92 ते 110 आणि AIADMK+ ला 22 ते 32 जागा मिळू शकतात.
तामिळनाडूचे एक्झिट पोल :
- मॅट्रिझ : DMK+ 122-132, AIADMK+ 87-110, TVK 10-12, इतर 0-6
- ॲक्सिस माय इंडिया : TVK 98-120, DMK+ 92-110, AIADMK+ 22-32
- P-MARQ : DMK+ 125-145, AIADMK+ 65-85, TVK 16-26, इतर 1-6
- चाणक्य रणनीती : DMK+ 145-160, AIADMK+ 50-65, TVK 0, इतर 18-26
केरळमध्ये सत्ताबदल निश्चित :
140 जागांच्या विधानसभेसाठीच्या एक्झिट पोलच्या निकालांनुसार, डाव्यांचा हा शेवटचा बालेकिल्ला कोसळताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार, केरळमधील सत्ताधारी एलडीएफला 60 ते 65 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला 70 ते 75 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळं, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी बहुमत मिळवून सरकार स्थापन करु शकते. दुसरीकडे, भाजपाला राज्यात 3 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तरीही त्यांना चांगल्या कामगिरीचा विश्वास होता.
पुदुचेरीमध्ये एनडीएचं पुनरागमन :
पुदुचेरीबाबत बोलायचं झाल्यास, ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार 30 जागांच्या विधानसभेत एनडीए आघाडी घेत असल्याचं दिसून येते. एक्झिट पोलनुसार, एनडीएला 16 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे, जो बहुमताच्या 16 जागांच्या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे. यावरुन असं सूचित होतं की, एनडीए या केंद्रशासित प्रदेशात सहजपणे सरकार स्थापन करु शकते. काँग्रेस-डीएमके आघाडीला केवळ 6 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे, त्यामुळं त्यांच्याकडून प्रबळ आव्हान उभं राहण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच, एक्झिट पोलनुसार, पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि दोन राज्यांमध्ये विरोधी पक्षांची आघाडी सरकार स्थापन करेल असा अंदाज आहे.







