Fuel price hike impact on farmers : खरीप हंगाम अगदी तोंडावर आलेला असताना ग्रामीण भागात पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून डिझेल आणि इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ट्रॅक्टरचे भाडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतीचा उत्पादन खर्च झपाट्याने वाढून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. परिणामी अनेक ठिकाणी शेतकरी नाईलाजाने पुन्हा पारंपरिक बैलजोडीकडे वळताना दिसत आहेत.
आधुनिक काळात शेती पूर्णपणे यांत्रिकीकरणाकडे वळली आहे. नांगरणी, वखरणी, पेरणी, फवारणी आणि कापणीपासून ते माल बाजारात नेण्यापर्यंत सर्वच कामांसाठी ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रांवर शेतकरी अवलंबून आहेत. यामुळे शेतीचे काम वेगाने आणि कमी वेळात पूर्ण होते. मात्र दुसरीकडे इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे या यांत्रिकीकरणाचा खर्चही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. डिझेल दरवाढीचा थेट परिणाम ट्रॅक्टरच्या मशागतीच्या दरांवर झालाय. प्रति एकर दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याचा फटका विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना बसत आहे. बाजारातील अनिश्चितता आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना इंधन दरवाढीने त्यात भर पडली आहे.
अनेक गावांमध्ये ट्रॅक्टरने मशागत करणे परवडत नसल्याने शेतकरी पुन्हा बैलजोडीकडे वळत आहेत. वर्षानुवर्षे मागे पडलेली बैलजोडी पुन्हा एकदा शेतात दिसू लागली आहे. काही शेतकऱ्यांनी तर ट्रॅक्टर न वापरता पारंपरिक पद्धतीने शेती सुरू केली . दुसरीकडे ट्रॅक्टर मालक चालक शेतकरीही मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते, इंधन खर्च आणि देखभाल खर्च यामुळे त्यांचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणले गेले खरे, पण इंधन दरवाढीमुळे तेच तंत्रज्ञान आता परवडेनासे झाले असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतीचा वेग कमी होण्याची भीती आहे. पेरणीचा हंगाम जवळ असताना मशागतीचा खर्च कसा भागवायचा, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या दरवाढीचा थेट परिणाम शेती क्षेत्रावर होतोय. आधुनिक शेतीला इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत असल्याने शासनाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची जोरदार मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.












