Beed boat accident devotees capsized : महाराष्ट्रात सध्या अधिकमास मोठ्या उत्साहात साजरा होत असताना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांच्या बोटीला भीषण अपघात झाला आहे. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात दर्शनासाठी निघालेली बोट अचानक उलटली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत. क्षमतेपेक्षा जास्त भाविकांना घेऊन गेल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे.
बोटीत ५० पेक्षा अधिक भाविक होते. नदीच्या मध्यभागी पोहोचताच बोट असंतुलित होऊन बुडाली. स्थानिक बोट चालक आणि नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. अनेकांना वेळीच बाहेर काढण्यात यश आले, मात्र प्रमिला राठोड या महिलेचा मृतदेह नदीत आढळला. वाशिम जिल्ह्यातील सिंधुबाई मवाळ या गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एक महिला आणि एक लहान मुलगा अद्याप बेपत्ता असल्याने शोधकार्य जोरात सुरू आहे.
ही दुर्दैवी घटना समोर आली
भाविकांनी सांगितले की, बोटीमध्ये लाईफ जॅकेटसारख्या कोणत्याही सुरक्षा सुविधा नव्हत्या. वारंवार अतिभाराने प्रवासी वाहतूक केल्याचे आरोप होत आहेत. पुरुषोत्तमपुरीतील मंदिराच्या दर्शनासाठी गोदावरी नदी पार करावी लागते. अधिकमासाच्या निमित्ताने येथे लाखो भाविकांची गर्दी झाली असल्याने बोटींची मागणी वाढली होती. मात्र, ती पूर्ण न झाल्याने अतिरिक्त प्रवाशांना घेऊन जाण्याची वेळ ओढवली होती. त्यामध्ये आता ही दुर्दैवी घटना समोर आली आहे.
तातडीने चौकशी अहवाल मागितला
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तातडीने चौकशी अहवाल मागितला आहे. दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक प्रशासन बचाव आणि मदत कार्यावर लक्ष ठेवून आहे.
भाविकांमध्ये भीतीचे वातावरण
पुरुषोत्तमपुरी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासात येथे विशेष यात्रा भरते. हजारो भाविक देशभरातून येतात. मात्र, या दुर्घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.












