Rahul Gandhi: देशभरातील तरुणाई विविध सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांवरून आवाज उठवत असताना, राहुल गांधी २२ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांच्या पुण्यातील आगामी कार्यक्रमाबाबत निर्माण झालेली अनिश्चितता अखेर संपली आहे. २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ (Chhatron Ki Goonj) कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी काही अटी आणि नियमांसह परवानगी दिली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या विद्यार्थिनींसोबतच्या संवाद कार्यक्रमाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा: ‘वय वाढलं म्हणून अपमान सहन करायचा नाही’; पालकांच्या मालमत्तेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
परवानगीवरून रंगला होता वाद
कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत कार्यक्रमाला परवानगी मिळाली नाही तरी आयोजन करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.
या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. पोलीस प्रशासन कार्यक्रमाला परवानगी देणार की नाही, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर पोलिसांनी कार्यक्रमासाठी आवश्यक मंजुरी दिल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
विद्यार्थिनींशी थेट संवाद
‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम विशेषतः विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राहुल गांधी तरुणींशी थेट संवाद साधणार असून, त्यांना विविध प्रश्न विचारण्याची संधीही मिळणार आहे. (Rahul Gandhi Pune Visit)
कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सहभागी होण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांतून विद्यार्थिनी पुण्यात दाखल होण्याची तयारी करत आहेत. पुणे हे मुलींच्या शिक्षणाच्या इतिहासाशी जोडलेले शहर असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पेपरफुटीपासून महिला सुरक्षेपर्यंत मुद्द्यांवर चर्चा
विद्यार्थ्यांच्या समस्या, स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या संधी तसेच महिला आणि मुलींवरील वाढत्या अत्याचारांसारख्या विषयांवर राहुल गांधी संवाद साधण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित विद्यार्थिनींना राहुल गांधी यांच्यासमोर थेट प्रश्न मांडता येणार आहेत. कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र मुख्य संवादाचा केंद्रबिंदू विद्यार्थिनी असणार आहेत.
प्रशांत जगतापांचा सरकारवर निशाणा (Prashant Jagtap)
कार्यक्रमाच्या परवानगीवरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशांत जगताप यांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर टीका केली होती. विरोधी पक्षांच्या कार्यक्रमांना अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुणे पोलिसांच्या कारभारावरही जगताप यांनी प्रश्न उपस्थित करत काही प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रियेबाबत आक्षेप घेतले. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर कार्यक्रमाच्या परवानगीबाबतच्या हालचालींना वेग आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
आता पोलिसांची मंजुरी मिळाल्यानंतर २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राहुल गांधींच्या या कार्यक्रमाकडे पुण्यासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







