BJP Crisis Manager in Trouble : ऑपरेशन ब्लू स्टारच्या ४२व्या स्मृतिदिनानिमित्त पंजाबातील अमृतसर येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने राजकीय वादळ निर्माण झाले आहे. दमदमी टकसालच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात महाजन हे राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी १९८४ च्या ऑपरेशन ब्लू स्टारला ‘काळा दिवस’ म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडदात उमटत असून भाजपने देखील हात झटकले आहेत. त्यामुळे भाजपचे संकटमोचकच संकटात सापडल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना महाजन यांनी १९८४ च्या ऑपरेशन ब्लू स्टारला ‘काळा दिवस’ म्हटले. या कारवाईत मृत्यूमुखी पडलेल्यांचा उल्लेख ‘शहीद’ करत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निर्णयावर तीव्र टीका केली. “सुवर्ण मंदिर परिसरात सैन्याची कारवाई ही आमच्या पवित्र स्थळावर आक्रमण होते. इंदिरा गांधींनी जबरदस्तीने सैन्य पाठवले,” असे ते म्हणाले. याशिवाय त्यांनी या घटनेची तुलना १८व्या शतकातील अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणाशी केली, त्यांच्या या विधानानंतर विरोधकांना त्यांना चारही बाजूंने घेरलं आहे.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलींचा उल्लेख
महाजन यांनी पुढे म्हटले की, या कारवाईत निष्पाप नागरिकांचा बळी गेला आणि शीख समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलींचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. त्या काळात शीख समाजाला अन्याय आणि हिंसाचाराचा सामना करावा लागला, असेही त्यांनी सांगितले.
महाजन यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला राजकीय रंग
हा कार्यक्रम दमदमी टकसालच्या प्रमुख बाबा हरनाम सिंह खालसा ‘धुमा’ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शीख विभाजनवादी नेते जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचे उदात्तीकरण करण्यात आले असल्याचे सांगितले जाते. भिंद्रनवाले यांच्या छायाचित्रांसह खालिस्तान समर्थक घोषणाही काही ठिकाणी लागल्याच्या बातम्या आल्या. महाजन यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला राजकीय रंग चढला.
भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध भारतीय सैन्याने केलेली कारवाई
ऑपरेशन ब्लू स्टार ही १९८४ मध्ये सुवर्ण मंदिर परिसरात भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध भारतीय सैन्याने केलेली कारवाई होती. या कारवाईत अनेक लोक मारले गेले, मंदिर परिसराचे नुकसान झाले आणि शीख समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. यानंतर इंदिरा गांधींची हत्या आणि देशभरात शीखविरोधी दंगे झाले. राजकीय प्रतिक्रियावाद वाढताच भाजपने हात झटकले.
पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाजनांवर नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. तर विरोधकांनी मात्र भाजपवर टीका केली. महाराष्ट्र काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने महाजन यांच्या मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली. काहींनी याला पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ‘शीख भावना’ जिंकण्याची रणनीती म्हटलं आहे.











