NCP Zilla Parishad Panchayat Samiti Election : महाराष्ट्र राज्यात आता महापालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. सध्या जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून आता बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचा चर्चांना उधाण आले आहे.
युती झाल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादी घडाळ्याच्या चिन्हावर शिक्कामोर्तब
बारामतीत राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरु असून बैठकांना सुरुवात झाली आहे. यासह शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्याकडे 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समितीच्या जागा मागितल्याची सूत्रांची माहिती समोर आली असून युती झाल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादी घडाळ्याच्या चिन्हांवर निवडणूक लढवण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिष्टमंडळ अजित पवारांच्या भेटीला
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिष्टमंडळ अजित पवारांना भेटण्यासाठी गेल्याची माहिती समोर आली आहे. आज एकत्र लढण्याबाबत दोघांना एकत्रित लढण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असून कोणत्या चिन्हांवर निवडणूक लढवणार हे लवकरच समजेल अशी आशा आहे.
हे ही वाचा : धनुष्यबाण आणि घड्याळ कोणाचं? सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी; राज्यातील राजकीय समीकरण बदलणार
सिंधुदुर्गात महायुती
आज जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या 50 जागा तर पंचायत समितीसाठी 100 जागा असून त्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. सिंधुदुर्गात महायुती झाली असून महाविकास आघाडी बाबत अद्याप संभ्रम आहे. उमेदवारी न मिळाल्याने काही कार्यकर्ते नाराज असून बंडखोरीच ग्रहण सर्वच पक्षांना सहन करावे लागणार आहे. सिंधुदुर्गात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारानीं मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
कोल्हापुरात एवढे उमेदवारी अर्ज प्राप्त
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आजवर जिल्हा परिषदेसाठी 42 आणि पंचायत समितीसाठी 43 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत 818 उमेदवारांना 1 हजार 570 उमेदवारी अर्जाचे वितरण करण्यात आले आहे. आजअखेर निवडणूक विभागातून 42 आणि निर्वाचन गणातून 43 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. आजअखेर 1 हजार 911 उमेदवारांना 3 हजार 851 इतके अर्ज वितरित करण्यात आले आहेत.












