Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी महानगरपालिका महापौर पदाची निवडणूक वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापौर पदाची उमेदवारी जाहीर केलेले नारायण चौधरी यांनी भाजपातील एक गट व शिवसेना पक्ष सहकार्य करीत नसल्याचे कारण देत व शहराध्यक्ष रवी सावंत यांनी अचानक महापौर पदासाठी स्नेहा मेहुल पाटील यांचे नावे पत्र दिल्याने व्यथित झाले आहेत. भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सेक्युलर फ्रंट सोबत जाण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी केलेल्या आरोपाचे शिवसेना गटनेते मनोज काटेकर यांनी खंडन केले असून भाजपामध्ये दोन गट पडले व त्यामुळे भाजपा उमेदवार पळून गेले त्याचे खापर आमच्यावर का फोडता असा सवाल केला आहे.
शिवसेना पक्षावर केलेला आरोप चुकीचा व निराधार
भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी यांनी शिवसेना पक्षावर केलेला आरोप चुकीचा व निराधार आहे. भाजपाचे 22 व शिवसेनेचे 12 अशा 34 नगरसेवकांचे एकत्र बैठक झाली त्यावेळेस आपण एकत्र कॅम्प लावू असे ठरले होते. परंतु त्यानंतर भाजपामध्येच दोन गट पडले. त्यामुळे एक गट भाजपाच्या कॅप मध्ये गेलाच नाही. त्यानंतर आम्ही भिवंडी शहरातच राहिलो आहोत. शिवसेने कडून तीन दिवसापूर्वी कॅम्प लावला त्यामध्ये शिवसेनेचे सर्व नगरसेवक आम्ही एकत्र आहोत. त्यानंतर आम्ही भाजपाचे गटनेते संतोष शेट्टी यांच्याशी सतत संपर्कात होतो. त्यांचे नगरसेवक एकत्र आले नाही त्याचा दोष आमच्यावर लावणे चुकीचे आहे.
सेक्युलर फ्रंट सोबत जाण्याचा निर्णय चुकीचा
भाजपाच्या नगरसेवकाने सेक्युलर फ्रंट सोबत जाण्याचा निर्णय चुकीचा असून भिवंडी शहराच्या विकासला बाधा आणणारा आहे. शिवसेना पक्ष ज्यांना शब्द देतो ते पूर्ण करतो हा भिवंडी शहराचा इतिहास आहे.अशा परिस्थिती मध्ये महापौर पदाचा उमेदवार पळून जात असेल तर ते दुर्दैवी आहे. महापौर पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाच ही प्रक्रिया सुरू झाली. काँग्रेसचे ३० नगरसेवक असताना एकमात्र तारिक मोमिन यांनी महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला तेव्हाच शंकेचे पाल चुकचुकली की यामध्ये काही तरी काळेबेरे आहे म्हणून यामागे पक्षाचे पाठबळ असू शकतो.
बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळासाठी सर्वच राजकीय पक्ष मैदानात
भिवंडीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ सर्वच जमा करत होते. आम्हाला साथ देणारे भिवंडी विकास आघाडीचे ३ समाजवादी पक्षाचे ६ आमच्या सोबत आहेत. सत्ता स्थापन करताना सोबत येणाऱ्यांना आम्ही घेणारच. पण उमेदवार निवडणुकीच्या दिवशी २० फेब्रुवारी रोजी ठरवायचा आहे. त्यांना अगोदरच शंका का वाटली त्यामुळे ते अगोदरच का पळून गेले असा सवाल शिवसेना गटनेते मनोज काटेकर यांनी उपस्थित केला आहे.











