Richest temples in India : सोनं खरेदी करू नका असं थेट आवाहन खुद्द पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) केल्यानंतर देशातल्या सोन्याच्या व्यापारात मोठी उलथापालथ झाली. एकीकडे सोने व्यापाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आणि अस्वस्थता आली आहे. तर लग्नसराईच्या मोसमात ग्राहक सुद्धा मोठ्या संभ्रमात आहे. पण मुद्दा हा आहे की जर का एवढीच मोठी संकटाची स्थिती आहे तर लोकांना सोनं खरेदी करू नका सांगण्यापेक्षा सरकार यावर वेगळा उपाय का नाही काढू शकतं. यावर एक चांगला उपाय आहे ज्यामुळे हि समस्या मुळापासून नाही मात्र बऱ्याच अंशी कमी होऊ शकते. परदेशातून सोनं आयातीवर जो पैसा टाकला जातोय तो मोठ्या प्रमाणात वाचवता येऊ शकतो.
सोनं खरेदी वाढल्यानं देशाला परकिय चलनाप्रमाणे सोनं खरेदी करण्यासाठी मोठ्या आर्थिक तोटा सहन करावा लागतोय अशी बोंब आता उठवली जातेय. परदेशातून सोनं आयातीसाठी लागणारा हा आर्थिक तोटा रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी भारतीयांना पुढचं 1 वर्ष सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र याहून एक चांगला पर्याय म्हणजे परदेशातून सोनं घेण्यापेक्षा भारतात लाखो टन असलेलं सोनं खरेदी करण्याचा केंद्र सरकार का विचार करत नाही. आता तुम्ही म्हणाल भारतात तर सोन्याचं अल्प उत्पादन होतं होय ते खरं आहे.
भारतात फक्त 3 ते 4 सोन्याच्या खाणी आहेत. देशातल्या एकूण सोन्यापैकी सुमारे 99% उत्पादन हे कर्नाटकातल्या एकट्या हुट्टी खाणीतून होते. मात्र आपल्या देशात जेवढी प्रंचड मोठी देवस्थानं आहेत तिथं हजारो किलो सोनं उपलब्ध आहे. अंदाजांनुसार, भारतातील प्रमुख श्रीमंत मंदिरांकडे मिळून किमान 15 ते 25 टनांपेक्षा अधिक सोने असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. काही व्यापक अंदाजांनुसार देशातील विविध मंदिरांकडे शेकडो ते हजारो टन सोने असू शकते, परंतु याची अधिकृतरीत्या पडताळणी कधी झालेलीच नाही.
भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थानं आणि त्यांच्याकडील सोनं
1. श्री पद्मनाभस्वामी मंदिर – अंदाजे सोनं – 1300 टन (अधिकृत मोजणी अद्याप नाही)
2. तिरूमाला व्यंकटेश्वरम मंदिर (तिरुपति बालाजी) – अंदाजे सोनं – 11 टनांहून अधिक
3. शिर्डी साई बाबा मंदिर – अंदाजे सोनं – 1800 किलो
4. सिध्दिविनायक मंदिर, मुंबई – अंदाजे सोनं – 1500 किलो
5. वैष्णोदेवी मंदिर – अंदाजे सोनं – 1600 किलो
6. गोल्डन टेंपल – अंदाजे सोनं – 750 किलो
7. स्वामी जगन्नाथ मंदिर – अंदाजे सोनं – 1200 किलो
8. सोमनाथ मंदिर – अंदाजे सोनं – 1000 किलो
सोनं परदेशातून आयात करण्याची गरज लागणार नाही
हि आकडेवारी पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या देशात सोनं उपलब्ध आहे. हि तर फक्त काही टॉपची देवस्थान आपण पाहिलीत, याहून अनेक अशी देवस्थानं आहेत जिथं दर वर्षाला हजारो किलो सोनं जमा होत असतं. अनेक देवस्थानांकडील सोन्याचं तर आजवर ऑडीटही झालेलं नाही. जर का केंद्र सरकारनं या सर्व श्रीमंत देवस्थानांकडून सोनं खरेदी करून बाजारात आणलं तर ते आपल्याच पैशात सरकारला विकत घेता येऊ शकतं. त्यासाठी डॉलरप्रमाणे पैसा खर्च करून सोनं परदेशातून आयात करण्याची गरज लागणार नाही. मात्र या गोष्टीचा सरकारने कधी विचार केलेला नाही.
युद्धाच्या परिस्थित देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लागेल
या देवस्थानांमध्ये आलेलं सोनं हे केवळ दान स्वरूपातलं आहे, ती कोणाची खाजगी मालमत्ता नाही. आणि तसं पाहयला गेलं तर या सोन्याचा वापर कोणत्याही सामाजिक कामांसाठी मोठ्या प्रमाणात केला जात नाहीय. हे सोनं ठेवी स्वरूपात ठेवलं जातं फक्त. खरतंर अनेक श्रीमंत देवस्थानं हि आता केंद्र सरकारच्याच अखत्यारित येतात. तेव्हा हेच सोनं खरेदी करून पुन्हा बाजारात आणलं गेलं पाहिजे जेणेकरून या युद्धाच्या परिस्थित देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लागेल. भारताचा पैसा बाहेर जाण्यापेक्षा भारतातच वापरला जाईल.आणि सोनं खरेदी करू नका असं आवाहन करून आज देशभरात जी पॅनिक परिस्थिती निर्माण झाली आहे, ती सुद्धा टाळता येऊ शकते.












