Shani Jayanti 2026 Date: यंदा १६ मे २०२६ रोजी शनी जंयती साजरी केली जाणार आहे. या दिवशी वैशाख अमावस्या, दर्श अमावस्या आणि शनि जयंतीचा दुर्मिळ संयोग असल्याने या दिवसाला धार्मिक आणि ज्योतिषीय महत्व प्राप्त झाले आहे.
वैदिक पंचांगानुसार, १६ मे २०२६ रोजी वैशाख अमावस्या साजरी होत आहे. याच दिवशी शनि जयंती, दर्श अमावस्या आणि भाविका अमावस्या यांचा विशेष संयोग आल्याने धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. अनेक श्रद्धाळू या दिवशी शनिदेवाची पूजा, पितृतर्पण आणि दानधर्म करून जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी प्रार्थना करतात.
हेही वाचा: मोठी राजकीय हालचाल! सुनील तटकरे यांची शरद पवारांना सिल्व्हर ओकवर भेट; नेमकं कारण काय?
शनि जयंतीचे महत्व
पुराणांनुसार वैशाख अमावास्येच्या दिवशी सूर्यदेव आणि छाया यांच्यापासून शनिदेवांचा जन्म झाला. त्यामुळे ही तिथी शनि जयंती म्हणून ओळखली जाते. शनिदेवांना कर्मफलदाता मानले जाते. व्यक्तीच्या कर्मानुसार ते फळ देतात, अशी श्रद्धा आहे.
दर्श अमावस्या म्हणजे काय?
अमावस्येच्या दिवशी चंद्राचे दर्शन होत नाही. या तिथीला ‘दर्श अमावस्या’ म्हटले जाते. पितृकार्य, तर्पण आणि दानधर्मासाठी हा दिवस शुभ मानला जातो. वैशाख महिन्यातील अमावस्येला विशेष पुण्यदायी मानले जाते.
भाविका अमावस्येचे धार्मिक महत्त्व
या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ तर्पण, अन्नदान किंवा धार्मिक कार्य केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते आणि कुटुंबात शांतता व सौहार्द वाढते, अशी मान्यता आहे.
शनि जयंतीला केले जाणारे पारंपरिक उपाय
१. तैलाभिषेक
शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाने अभिषेक करणे शुभ मानले जाते. अनेक भक्त काळे तीळ आणि उडीद अर्पण करतात.
२. मंत्रजप
शनिदेवाच्या कृपेसाठी खालील मंत्राचा जप केला जातो:
“ॐ शं शनैश्चराय नमः”
श्रद्धेनुसार १०८ वेळा मंत्रजप केल्यास मानसिक शांतता आणि सकारात्मकता मिळते.
३. दानधर्म
गरजू व्यक्तींना अन्न, कपडे किंवा आवश्यक वस्तू दान करणे महत्त्वाचे मानले जाते. काळे कपडे, छत्री, चप्पल किंवा लोखंडी वस्तू दान करण्याचीही प्रथा आहे.
४. पिंपळ वृक्षाची पूजा
संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावून प्रदक्षिणा घालण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. यामुळे शनीदोष कमी होतो, अशी श्रद्धा आहे.
५. चांगल्या कर्मांवर भर
प्रामाणिकपणा, सत्य आणि इतरांचा आदर हीच खरी शनिदेवाची उपासना मानली जाते. कोणालाही त्रास न देणे आणि आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे यालाच सर्वश्रेष्ठ उपाय मानले जाते.






