Ajit Agarkar : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा करार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जून 2026 मध्ये संपणारा त्यांचा कार्यकाळ जून 2027 पर्यंत एका वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा भारतीय संघानं अलिकडच्या वर्षांत आयसीसी स्पर्धांमध्ये अभूतपूर्व यश मिळवलं आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, आगरकर यांच्या नेतृत्वाखाली संघातील स्थित्यंतर सुरळीत झालं आहे आणि त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय निर्भयपणे घेतले आहेत.
हेही वाचा : अक्षय्य तृतीच्या मुर्हूतावर सोने-चांदीचा भाव काय? पाहा ताजे दर
आगरकरांच्या कार्यकाळात अनेक स्पर्धा जिंकल्या :
पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अजित आगरकर यांच्या निवडकर्तापदाच्या कार्यकाळात भारतीय संघानं आयसीसीची अनेक विजेतेपदं पटकावली आहेत. त्यांच्या कार्यकाळात भारतानं 2024 मध्ये टी-20 विश्वचषक, 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला. याव्यतिरिक्त, भारतीय संघ 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता. पुढील वनडे विश्वचषक 2027 मध्ये होणार असल्यानं, आगरकर यांनी मुख्य निवडकर्ता म्हणून संघासोबत राहावं याला बीसीसीआय प्राधान्य देत आहे. या मुदतवाढीवर औपचारिक चर्चा करण्यासाठी बोर्डाचे अधिकारी लवकरच आयपीएल सामन्यांदरम्यान त्याला भेटतील.
सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद यशस्वी :
आगरकर यांची प्रतिष्ठा वाढली असली तरी, टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवच्या भविष्यावर अनिश्चिततेचं सावट आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली भारतानं 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकला असला तरी, एक फलंदाज म्हणून त्याच्या कामगिरीत सातत्यानं घसरण झाली आहे. टी-20 विश्वचषकाच्या प्रमुख सामन्यांमध्ये सूर्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली. त्यानं दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी केवळ 18 धावा केल्या, तर उपांत्य फेरीत 11 धावा केल्या आणि न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण अंतिम सामन्यात त्याला खातंही उघडता आलं नाही. 2025 हे वर्षही त्याच्यासाठी निराशाजनक ठरलं, कारण त्याचा स्ट्राइक रेट 120 च्या खाली घसरला होता.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2025 मोठं आव्हान :
सूर्यकुमार यादवचं टी-20 मधील भविष्य आता पूर्णपणे त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर अवलंबून आहे. जरी तो मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पहिली पसंती असला आणि गंभीर यांचा कार्यकाळ 2028 पर्यंत वाढवला जाऊ शकत असला तरी, निवड समितीला सूर्याच्या वयाची चिंता आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषकापर्यंत सूर्या जवळपास 38 वर्षांचा होईल. त्यामुळं, इंग्लंड आणि आयर्लंडचा आगामी दौरा त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. वैभव सूर्यवंशीसारखे अनेक तरुण खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत असल्यानं, बीसीसीआय आता त्याच्या कामगिरीच्या आधारावर त्याच्या कर्णधारपदाचा आणि संघातील स्थानाचा निर्णय घेईल.







