Women Asia Cup : वुमन्स आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला 46 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारताचे बाजूने लागला होता. कर्णधार राधा यादवने क्षणाचाही विलंब न करता प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 134 धावा केल्या. तसेच विजयासाठी 135 धावांचे आव्हान दिले. पण या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 19.1 षटकात 88 धावा करू शकला. भारताने 46 धावांनी विजय मिळवत विजेतेपद खिशात घातले आहे.
या विजयासह एसीसी महिला आशिया कप रायझिंग स्टार्सचे विजेतेपद कायम ठेवले. या सामन्यात भारताची सुरूवात फार काही चांगली झाली नाही. अवघ्या 44 धावांवर चार गडी तंबूत होते. पण मधल्या फळीत तेजल हसबनीस आणि राधा यादव यांनी डाव सावरला. पाचव्या विकेटसाठी या दोघांनी 69 धावांची भागादारी केली. या भागीदारीमुळे भारताला 134 धावांपर्यंत मजल मारता आली. तेजल हसबनीसने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. तिने 34 चेंडूत 51 धावा केल्या. यात तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
भारताने विजयासाठी दिलेल्या 135 धावा करताना बांगलादेशचा डाव पत्त्यासारखा कोसळला. एकही फलंदाज 20च्या पुढे धावा करू शकला नाही. सहा फलंदाजांचा डाव तर एकेरी धावसंख्येवरच आटोपला. विकेटकीपर शमिमा सुल्तानाने सर्वाधिक 20 धावांची खेळी केली. इशमा तनजीम 3, समिन सुल्ताना 18, सादिया अक्तर 10, लता मोंडल 1, फहिमा खातुन 14, फरजाना इस्मिन 6, शोरिफा खातुन 9, संजिदा अक्तर मेघला 5, फतेमा जहान सोनिया 1 अशा धावा करून बाद झाले. भारताकडून प्रेमा रावतने 4 षटकात 12 धावा देत 3 गडी बाद केले. तर सोनिया मेंदिया आणि तनुजा कंवरने प्रत्येकी 2, तर साईमा ठाकोर, मिन्नू रावतआणि राधा यादवने प्रत्येकी 1 विकेट काढली.












