Jammu Bus Accident | जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Bus Accident) घडला आहे. जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील रामनगर काघोट परिसरात एका प्रवासी बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पंधरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताने जम्मूमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – अमरावती हादरली! 65 वर्षीय महिलेवर तरुणाने केला बलात्कार, धक्कादायक घटना उघडकीस
अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी बस रामनगरहून उधमपूरकडे जात होती. यादरम्यान बसचालकाचा भरधाव वेगात असलेल्या बसवरील ताबा सुटला आणि बस थेट दरीत कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की यात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिक आणि पोलीस अधिकारी घटानस्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू केले आहे. तर या अपघातातील जखमींना तातडीनं जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
या अपघाताची दखल केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी घेतली असून त्यांनी या घटनेची माहिती दिली आहे. जितेंद्र सिंह यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आत्ताच उधमपूरचे डीसी मिंगा शेर्पा यांच्याशी माझा संपर्क झाला. मला माहिती मिळाली की, तासाभरापूर्वी कानोट गावात एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. या अपघातात रामनगरहून उधमपूरला जाणारी सार्वजनिक वाहतुकीची बस सामील होती. तर या अपघातानंतर बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची भीती आहे. सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले जाईल. तसेच गंभीर जखमींना विमानाने हलवण्याची व्यवस्था केली जात आहे. मी स्थानिक प्रशासनाच्या, तसेच राजिंदर शर्मा यांच्या नेतृत्वाखालील आमच्या स्थानिक स्वयंसेवकांच्या टीमच्या सतत संपर्कात आहे”, असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.
Just now spoke to DC Udhampur, Sh Minga Sherpa after learning about a tragic road accident, less than an hour ago, at village Kanote, involving a public transport bus on way from Ramnagar to Udhampur .
The rescue operation has been immediately undertaken. Heavy casualties…
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) April 20, 2026
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “उधमपूरमधील भीषण रस्ते अपघात हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. देव त्यांना शक्ती देवो. तसेच जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. मी जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ आणि आरोग्य विभागाला जखमी प्रवाशांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत”, असं मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे.











