Maharashtra ST Bus Accident in Gujarat: गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसमध्ये झालेल्या भीषण अपघात ७ जणांच्या मृत्यू झाला असून ४१ प्रवासी जखमी झाले आहेत. बारडोलीजवळील धुळे महामार्गावर हा अपघात घडला. धडकेनंतर एका बसला आग लागल्याने मोठी जीवितहानी झाली. चला तर जाणून घेऊयात नेमका अपघातमागेचे कारण काय आहे.
प्राथमिक माहितीनुसार, उवा गावाजवळ रसतावर एक पाण्याचा टँकर उलटला होता. त्याच मार्गावरून धुळे आगाराची एसटी बस सुरतकडे जात होती. टँकरमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. बस नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात ती विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली. यावेळी समोरून येणारी सुरत-जामनेर एसटी बस तिच्यावर आदळली.
हेही वाचा: नसरापूर अत्याचार प्रकरणात पीडित बालिकेच्या आजीची साक्ष; १३ साक्षीदारांचे जबाब पूर्ण
धडक इतकी जोरदार होती की सुरत- जामनेर बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन पडली आणि त्यानंतर तिला आग लागली. अपघातानंतर परिसरात मोठी धावपळ उडाली.
मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी
बारडोली येथील सरदार शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. भावेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी केवळ एका व्यक्तीची ओळख पटली असून ही व्यक्ती सुरत-जामनेर बसचा चालक असल्याचे समोर आले आहे.
उर्वरित सहा मृतदेह आगीत गंभीररीत्या जळाल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण झाले आहे. त्यामुळे नातेवाईकांच्या नमुन्यांशी तुलना करून डीएनए तपासणीद्वारे ओळख निश्चित केली जाणार आहे.
गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्रातील एसटी बसचा अपघात होऊन काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
एसटी आणि जळगाव जिल्हा प्रशासन सुरत जिल्हा प्रशासनाशी संपर्कात आहेत आणि…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 2, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया
या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
राज्य सरकार जखमींना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र एसटी प्रशासन आणि जळगाव जिल्हा प्रशासन गुजरातमधील सुरत जिल्हा प्रशासनाशी सतत संपर्कात असून मदतकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी जखमी प्रवाशांच्या लवकरात लवकर प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सर्वंकष चौकशी केली जाईल, असेही संकेत दिले आहेत.












