Bhuvan Chandra Khanduri Passes Away | उत्तराखंडचे (Uttarakhand) माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते भुवनचंद्र खंडुरी (Bhuvan Chandra Khanduri) यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. तर वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भुवनंचद्र खंडुरी यांच्या निधनाबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी माहिती दिली. त्यानंतर भुवनंचद्र खंडुरी यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
भुवनचंद्र खंडुरी यांच्या निधनानं राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त
भुवनचंद्र खंडुरी यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी अरुणा, मुलगा मनीष आणि मुलगी रितू खंडुरी भूषण यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून भुवनचंद्र खंडुरी हे वयोमानानुसार उद्भवणाऱ्या समस्यांनी त्रस्त होते. त्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत त्यांची मुलगी रितू खंडुरी भूषण यांनी माहिती दिली.
भुवनचंद्र खंडुरी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह राजकीय वर्तुळत शोककळा पसरली आहे. अनेक बड्या नेत्यांनी खंडुरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी माजी मुख्यमंत्री खंडुरी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. “भुवनचंद्र खंडुरी यांचे निधन हे केवळ उत्तराखंडसाठीच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणासाठीही कधीही भरून न येणारं नुकसान आहे. भुवनचंद्र खंडुरी यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावताना राष्ट्रसेवा, शिस्त आणि समर्पणाचा एक अतुलनीय आदर्श घालून दिला. सार्वजनिक जीवनातही त्यांनी उत्तराखंडचा विकास, सुशासन, पारदर्शकता आणि प्रामाणिक कामासाठी एक मजबूत ओळख निर्माण केली. त्यांनी राज्याच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि विकासाला एक नवी दिशा दिली”, असं पुष्कर सिंह धामी यांनी म्हटलं आहे.
भुवनचंद्र खंडुरी यांचा राजकीय प्रवास
भुवनचंद्र खंडुरी हे दोनदा उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. 2007 मध्ये मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचही जागांवर पक्षाचा पराभव झाला होता. तर या पराभवाची जबाबदारी स्वीकारून खंडुरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 2011 मध्ये भाजप पक्ष पुन्हा सत्तेत आला आणि पुन्हा एकदा त्यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. भुवनचंद्र खंडुरी हे माजी केंद्रीय मंत्री देखील होते. त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री म्हणून काम केले होते. विशेष म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी, खंडुरी हे भारतीय सैन्यातून मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले होते. त्यामुळे ते जनरल साहिब म्हणूनही ओळखले जात होते.












