CM Devendra Fadnavis On Cow Smuggling | राज्यातील गो-तस्करीला (Cow Smuggling) आळा घालण्यासाठी फडणवीस सरकारने कठोर आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने गो-तस्करीला आळा घालण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारने राज्यातील गो-तस्करीला, जनावरांच्या अवैध वाहतुकीला आणि अवैध कत्तलखान्यांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत.
हेही वाचा – पंतप्रधान मोदींविरोधात AI व्हिडीओ बनवणं पडलं महागात; पोलिसांनी केली कठोर कारवाई, नेमकं प्रकरण काय?
गो-तस्करीला आळा घालण्यासाठी फडणवीस सरकारने काय घेतला निर्णय?
गृह विभागाने जारी केलेल्या़ आदेशानुसार, संघटित गो-तस्कर टोळ्या आणि रॅकेट्सवर आता थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. राज्य सरकारने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना आपापल्या भागातील अवैध कत्तलखान्यांची चौकशी करून त्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच कुठेही अवैध कत्तलखाने कार्यरत नाहीत याची खात्री करण्याची जबाबदारीही स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त तपासणी नाके उभारण्याचा निर्णय घेतला आहे जिथे पोलीस, परिवहन विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक प्रशासनाची संयुक्त पथके नियमित तपासणी करतील. तसेच सरकारने परिवहन विभागाला बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारने हे देखील स्पष्ट केलं आहे की, गो-तस्करी, जनावरांची अवैध वाहतूक किंवा अवैध कत्तलखान्यांच्या तक्रारी 112 या हेल्पलाइन क्रमांकावर प्राप्त झाल्यानंतर संबंधित पोलीस विभाग तात्काळ कारवाई करेल. यासाठी या संपूर्ण मोहिमेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांना देण्यात आली आहे.












