PM Modi Address : महिला आरक्षण विधेयकावरुन राष्ट्रीय राजकारण तापत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) देशाला संबोधित केलं असून, या महत्त्वाच्या विषयावर आपले विचार मांडले आहेत. आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदींनी महिला सक्षमीकरण, राजकारणातील त्यांचा सहभाग आणि संसदेतील महिलांची वाढती भूमिका यावर भर दिला. त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणाही साधला.
विधेयक मंजूर न झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी मागितली माफी :
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज मी माझ्या भगिनी आणि कन्यांशी बोलण्यासाठी आलो आहे. आज भारताचा प्रत्येक नागरिक पाहत आहे की, भारताच्या महिला शक्तीचा उदय कसा रोखला गेला. त्यांची स्वप्नं निर्घृणपणे चिरडली गेली. आमच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही. नारी शक्ती वंदन कायदा संसदेत मंजूर होऊ शकला नाही. यासाठी मी सर्व माता आणि भगिनींची माफी मागतो.”
महिलांच्या कल्याणाचा प्रस्ताव विरोधी पक्षानं फेटाळला :
पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधी पक्षानं महिलांच्या कल्याणाचा प्रस्ताव फेटाळला. विरोधी पक्षानं महिलांची स्वप्नं चिरडली. मी देशातील महिलांची माफी मागतो. महिला सर्व काही विसरतात, पण स्वतःचा अपमान कधीच विसरत नाहीत. मला विरोधकांना सांगायचं आहे की, 21 व्या शतकातील महिला प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांना सत्याची पूर्ण जाणीव आहे.
विरोधकांच्या स्वार्थी राजकारणामुळं महिलांना त्रास :
पंतप्रधान मोदी पुढं म्हणाले, “आमच्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोपरि आहे. पण जेव्हा काही लोकांसाठी पक्षाचं हित सर्वस्व बनतं, जेव्हा पक्षाचं हित राष्ट्रीय हितापेक्षा मोठं होतं, तेव्हा महिला शक्ती, म्हणजेच राष्ट्रीय हिताला, त्याचा फटका सहन करावा लागतो. यावेळीही हेच घडलं आहे. काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्षासारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळं देशाच्या महिला शक्तीला फटका बसला आहे.”
काँग्रेस, एसपी आणि टीएमसीला नक्कीच शिक्षा होईल :
पंतप्रधान मोदी म्हणाले की, या विधेयकामुळं उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिममधील सर्व राज्यांना सक्षम केलं असते. काँग्रेस, एसपी आणि टीएमसीला नक्कीच शिक्षा होईल. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन त्यांनी पाप केलं आहे. ते देशाच्या महिला शक्तीचे गुन्हेगार आहेत. महिला आरक्षण ही काळाची गरज आहे. विरोधकांनी आमच्या प्रामाणिक प्रयत्नांची अयशस्वी हत्या केली आहे.
काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसचा महिलांच्या आत्मसन्मानावर हल्ला :
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षासारखे घराणेशाहीचे पक्ष आनंदानं टाळ्या वाजवत होते. महिलांचे हक्क हिसकावून घेतल्यानंतर ते टेबलांवर हात आपटत होते. त्यांनी जे केलं ते केवळ टेबलांवर हात आपटणं नव्हतं; तो महिलांच्या आत्मसन्मानावर आणि स्वाभिमानावर केलेला हल्ला होता.









